‘पी.एफ्.आय.’चा संशयित मौलाना इरफान नदवी याने नूपुर शर्मा यांच्या विरोधात चिथावणीखोर संदेश प्रसारित केल्याचे उघड !

मालेगाव (जिल्हा नाशिक) – आतंकवादासाठी अर्थपुरवठा करण्याच्या प्रकरणी आतंकवादीविरोधी पथकाने १३ नोव्हेंबरला मालेगावमधून पी.एफ्.आय. या बंदी घातलेल्या संघटनेचा सातवा संशयित आरोपी मौलाना इरफान दौलत नदवी उपाख्य इरफान खान याला अटक केली. त्याने संभाजीनगर, बीड, जालना आणि नांदेड या शहरांत भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या विरोधात सामाजिक माध्यमांतून चिथावणीखोर संदेश प्रसारित केल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. आतंकवादविरोधी पथकाने २ घंटे नदवी याच्या घराची झडती घेतली. तेथून काही धार्मिक पुस्तके आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. (अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक) झडतीनंतर पथक मौलाना नदवी याला घेऊन पुन्हा नाशिक येथे परतले.

१. आरोपी नदवी याने धार्मिक संघर्ष निर्माण करत यापूर्वी अटक केलेल्या ६ संशयितांशी  अनेक वेळा भ्रमणभाषद्वारे संभाषण केल्याचे उघडकीस आले आहे. (नदवी याचे देशद्रोही कृत्य चालू असतांना याची पोलिसांच्या गुप्तचर विभागाला माहिती कशी मिळाली नाही ? पोलीस झोपले होते का ? यास उत्तरदायी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)  

२. ‘नदवी याने ‘व्हॉट्स अ‍ॅप’ गटातून चिथावणीखोर संदेश प्रसारित करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे’, असा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी त्याचा भ्रमणभाष संच जप्त केला आहे.

३. विशेष सरकारी अधिवक्ता अजय मिसर यांनी न्यायालयात युक्तीवाद करतांना सांगितले की, पुणे, मालेगाव आणि जळगाव येथून अटक केलेल्या ६ संशयितांसमवेत नदवी याने भ्रमणभाषद्वारे संवाद साधत संवेदनशील आणि आक्षेपार्ह विधाने केलेली आहेत.

४. या वेळी या संभाषणाच्या ध्वनीफीती न्यायालयात सादर करण्यात आल्या. नदवी हा प्रतिबंधित ‘ऑल इंडिया इमाम कौन्सिल संघटने’चा अध्यक्षही आहे. मालेगाव येथे वर्ष २०१९ पासून तो ‘पी.एफ्.आय.’ संघटनेसाठी समन्वयक म्हणून काम करत आहे.

५. ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या गटाद्वारे धार्मिक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न तो करत होता. त्याच्यावर यापूर्वीही मालेगाव येथे गुन्हे नोंद आहेत.

६. नदवी याच्या आवाजाचे नमुने पोलिसांनी पडताळणीसाठी घेतले आहेत. त्याने संवाद साधतांना सांकेतिक भाषेचाही वापर केला आहे. दहशत पसरवण्यासाठी अर्थसाहाय्य कुणी आणि कुठून केले ? अन् परदेशांमधील संपर्क यांविषयी सखोल अन्वेषण करायचे आहे, असे सरकारी अधिवक्त्यांनी न्यायालयात सांगितले.