अफझलखानाच्या कबरीभोवती झालेले अवैध बांधकाम तोडण्यासाठी आंदोलन करणार्‍यांवरील गुन्हे मागे घ्या !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करणारे विहिंप-बजरंग दल, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते

कोल्हापूर, ११ नोव्हेंबर (वार्ता.) – १२ सप्टेंबर २००४ या दिवशी प्रतापगडावरील अफझलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण रोखण्यासाठी विश्व हिंदु परिषेदेने पाचवड ते भुईंजे येथील महामार्ग क्रमांक ४ रोखून धरण्याचे आंदोलन केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विश्व हिंदु परिषदेचे तत्कालीन संघटनमंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव, श्री. बाबूजी नाटेकर यांसह अनेकांवर गुन्हे नोंद करून कारागृहात ठेवले होते. तरी अफझलखानाच्या कबरीभोवती झालेले अवैध बांधकाम तोडण्यासाठी आंदोलन करणार्‍यांवरील गुन्हे घ्यावेत, या मागणीसाठी ११ नोव्हेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र शासनाने प्रतापगड येथील अफझलखानाच्या कबरीभोवती असलेले अवैध बांधकाम पाडून टाकले, यासाठी अभिनंदन करण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषेदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, भाजपचे श्री. महेश जाधव, शिवसेनेचे (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी त्या वेळी आंदोलनात कारागृहवास पत्करणारे अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी आणि श्री. माधव कुंभोजकर, तसेच शीतल सरनाईक, कैलास काइंगडे  यांचा सत्कार करण्यात आला. या आंदोलनात सर्वश्री शांतीभाई लिंबाणी, पराग फडणीस, अक्षय ओतारी, राजू गडकरी, प्रकाश कुलकर्णी, अजित पाटील, विहिंपचे विजयराव पाटील यांसह अन्य उपस्थित होते.

संपादकीय भूमिका 

राष्ट्ररक्षणासाठी आंदोलन करणार्‍यांवर गुन्हे नोंद केले जाणे हे हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते !