मुंबईत शांतता बिघडण्याच्या शक्यतेने ऐन दिवाळीत जमावबंदी लागू  !

चिनी कंदिलांवर बंदी

मुंबई – शहरातील शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांकडून शहरात १६ ते ३० ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. यामध्ये ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. ‘शहरात दंगल घडू नये आणि सार्वजनिक वित्त किंवा जीवित हानी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे’, असे या आदेशात नमूद केले आहे.

त्याचप्रमाणे १६ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत मुंबईत चिनी कंदील म्हणून समजल्या जाणार्‍या उडत्या कंदिलांचा वापर, विक्री आणि साठवणूक यांवर बंदी घालण्यात आली आहे. (मूळातच प्रशासन चिनी आकाशकंदिलाच्या आयातीवरच बंदी का घालत नाही ? – संपादक) ‘आकाशात कंदील उडवल्याने मानवी जीवन आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते’, म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

नेहमीच हिंदूंच्या सणांच्या वेळीच शहरातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडण्याचे षड्यंत्र असल्याचे उघड होते. केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना प्रत्येक वेळी हिंदूंंना आतंकवादाच्या सावटाखाली सण साजरे करावे लागणे, हे कितपत योग्य आहे ?