अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष प.पू. स्वामी सागरानंद महाराज यांचा देहत्याग !

प.पू. स्वामी सागरानंद महाराज

त्र्यंबकेश्वर – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष प.पू. स्वामी सागरानंद महाराज (वय १०२ वर्षे) यांनी ८ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ४ वाजता येथे देहत्याग केला. येथील रिंगरोड येथील आनंद आखाडा गजलक्ष्मी मंदिर येथे त्यांना समाधी देण्यात आली. येथे होणार्‍या अनेक सिंहस्थ कुंभमेळ्यांचे नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते. देशभरात त्यांचे लाखो भक्त आहेत.

अत्यंत मनमिळावू, शांत आणि संयमी साधू म्हणून प.पू. स्वामी सागरानंद महाराज परिचित होते. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे सचिव महंत शंकरानंद सरस्वती उपाख्य भगवान बाबा हे ५० वर्षांपासून त्यांच्या समवेत आहेत.

प.पू. स्वामी सागरानंद यांची सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यावर विशेष प्रीती !  

नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी प.पू. महाराजांकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना वेळोवेळी मार्गदर्शन अन् त्यांचा आशीर्वादही लाभले. त्यांनी वेळोवेळी सनातन आणि समिती यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांची सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते यांच्यावर विशेष प्रीती होती. ते साधकांना सांगायचे, ‘‘तुम्ही चांगले कार्य करत आहात. देव तुम्हाला साहाय्य करेलच. मी तुमच्या समवेत आहे.’’