आनंदप्राप्तीसाठी नियमित साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

तासगाव (जिल्हा सांगली), २९ ऑगस्ट (वार्ता.) – दैनंदिन जीवन जगतांना आपल्याला विविध समस्या येतात. यातील काही समस्या प्रारब्धामुळेही निर्माण होतात. यासाठी धर्मशास्त्राने कुलदेवीचे नामस्मरण आणि दत्ताची उपासना सांगितली आहे. आनंदप्राप्तीसाठी नियमित साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. बिरणवाडी येथील ‘क्लासिक ॲग्रो सोल्यूशन’, येथे सांगली जिल्ह्यातील उत्पादक, उद्योजक आणि व्यावसायिक यांच्यासाठी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या मार्गदर्शनासाठी ५१ व्यावसायिक उद्योजक सहकुटुंब उपस्थित होते. मार्गदर्शनानंतर अनेकांनी असे कार्यक्रम वारंवार व्हावेत, तसेच आमच्या घरी सत्संग चालू करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे सांगितले.

अभिप्राय

१. श्री. विजय पवार, तासगाव – सनातन संस्थेमुळे आयुष्यात पुष्कळ पालट झाला. साधनेमुळे विस्कटलेले कुटुंब एकत्र झाले, तसेच व्यावहारिक अडचणीही सुटल्या.

२. श्री. प्रदीप चव्हाण, येळावी – साधना चालू केल्यामुळे स्वभावात आमुलाग्र पालट झाला. पूर्वी स्वभाव तापट होता, तर आता शांतपणे कृती करता येते.

३. श्री. चैतन्य दडिवडे, म्हसवड – पूर्वी घरात वैचारिक मतभेद असायचे. त्यामुळे घरात तणाव असायचा. साधनेमुळे वैचारिक मतभेद अल्प होऊन आता आम्ही सर्व आनंदी आहोत.

४. श्री. विजय पवार, बिरणवाडी – १० मासांपूर्वी सनातनच्या संपर्कात आल्यानंतर साधना चालू केली. गेली १२ वर्षे चालू असलेला व्यवसाय ४ जिल्ह्यांच्या बाहेर जाऊ शकला नव्हता, तोच व्यवसाय आता ४ राज्यांमध्ये पसरला आहे.

५. श्री. अजय मोरे, बिरणवाडी – गावात हिंदुत्वाचे कार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करीन. हिंदुत्वविषयक ग्रंथ वितरण करण्याचा प्रयत्न करीन.

मार्गदर्शनासाठी उपस्थित जिज्ञासू

क्षणचित्रे

१. ‘गावात युवकांचे संघटन करू आणि सभेचे आयोजन करू’, असे श्री. विजय मोरे आणि श्री. संतोष कोळी यांनी सांगितले.

२. म्हसवड येथील श्री. चैतन्य दडिवडे हे सहकुटुंब उपस्थित होते. त्यांनी ‘त्यांच्या घरी असा कार्यक्रम घेऊ’, असे सांगितले.

३. ‘आमच्या गावातही असा धार्मिक कार्यक्रम आयोजित करू, तसेच गावातील लोकांना साधना सांगू’, असे बांबवडे येथील श्री. अनिल पाटील यांनी सांगितले, तर येळावी येथील श्री. प्रताप चव्हाण यांनी ‘गावात गणेशोत्सव मंडळात प्रवचन आयोजित करू’, असे सांगितले.