महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणार्‍या कोयना धरणाच्या सुरक्षेत वाढ !

कोकण प्रवेशद्वारावर नाकाबंदी

सातारा – रायगडमधील हरिहरेश्वर येथे आढळून आलेल्या संशयास्पद बोटीत ३ बंदुका आणि जिवंत काडतुसे सापडल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, तसेच कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या कराड येथे नाकाबंदी केली आहे. कराड-पाटण मार्ग हा कोकणचे प्रवेशद्वार आहे. या मार्गावर सध्या नाकाबंदी करण्यात आली आहे. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याची सीमा असणार्‍या घाटमाथ्यावर कोकणातून कराडकडे येणार्‍या आणि कराडहून कोकणात जाणार्‍या वाहनांची पडताळणी केली जात आहे.

कोयना धरणावर २४ घंटे कडक सुरक्षा असते, तसेच सुरक्षेच्या अनुषंगाने ‘वायरलेस’ यंत्रणाही सज्ज असते.

धरणाच्या सुरक्षेत वाढ !

कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी ३ पोलीस अधिकारी, ५२ पोलीस कर्मचारी आणि ३४ गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत, तसेच धरणाच्या सुरक्षेची प्रत्येक घंट्याला पहाणी केली जात आहे.