साधकांनो, राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्यास इच्छुक धर्मप्रेमी आणि साधक यांच्या सेवांचे तत्परतेने नियोजन करून समष्टी साधनेची हानी टाळा !

एक धर्मप्रेमी कामाच्या निमित्ताने एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात गेले होते. तेथे गेल्यावर त्यांनी त्या जिल्ह्यातील स्थानिक साधकांना संपर्क केला आणि त्यांना राष्ट्र-धर्माच्या कार्यात सहभागी करून घेण्यास सांगितले. दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही साधकांनी त्या धर्मप्रेमींना कार्यात सहभागी करून घेतले नाही.

त्या धर्मप्रेमींच्या मनात राष्ट्र-धर्म कार्याची तळमळ असल्यामुळे त्यांनी त्यासाठी स्वत:हून वेळ देण्याचे नियोजन केले होते; मात्र साधकांच्या अक्षम्य उदासीनतेमुळे ते धर्मप्रेमी धर्मकार्यापासून वंचित राहिले. एक धर्मप्रेमी कार्यात समर्पित होण्यासाठी सिद्ध असतांनाही त्यांना सहभागी करून घेतले नाही. त्यामुळे त्या साधकांच्या साधनेची मोठी हानी झाली.

धर्मप्रेमींच्या वेळेनुसार त्यांच्या सेवांचे नियोजन प्राधान्याने करावे, तसेच साधकांच्या वेळेचे नियोजनही योग्य प्रकारे करावे.

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था.