दोषींवर कठोर कारवाई करून नवी मुंबईतील सर्व चर्चच्या अंतर्गत असलेल्या वसतीगृहांची चौकशी करावी !

  • सीवूड (नवी मुंबई) येथील ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या चर्चमधील वसतीगृहातील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण

  • नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निवेदनाद्वारे मागणी

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. बिपीन कुमार सिंह (उजवीकडे) यांना निवेदन देतांना डॉ. (सौ.) ममता देसाई, तसेच समवेत (डावीकडून) श्री. वसंत सणस, श्री. विपीन सोलंकी, श्री. दीपकराज ठाकूर

नवी मुंबई – सीवूड्स, नवी मुंबई येथील ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या चर्चमधील वसतीगृहातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. ‘या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यात सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, तसेच नवी मुंबईतील सर्व चर्चच्या अंतर्गत असलेल्या वसतीगृहांची चौकशी व्हावी’, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या शिष्टमंडळाने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांना निवेदन दिले.

यावर पोलीस आयुक्त म्हणाले, ‘‘या प्रकरणातील गुन्हेगारांना साहाय्य करणार्‍यांविषयीची माहिती आम्हाला दिल्यास आम्ही त्याची अवश्य नोंद घेऊ. अशी प्रकरणे पुन्हा होऊ नयेत, यादृष्टीने पडताळणीसाठी आमचे वेगळे पथक आम्ही नेमले असून त्यालाही आम्ही योग्य ते निर्देश दिले आहेत’’.

निवेदन देतांना आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाच्या कोकण प्रांताचे जिल्हा सहमंत्री श्री. दीपकराज ठाकूर, खारघर प्रखंड विभागाचे श्री. सुधीर मलिक, धर्मप्रचारक श्री. राजेश चौहान, ‘एक मुठ्ठी अनाज’ योजनेचे उपाध्यक्ष श्री. विपिन सोलंकी, राष्ट्रीय महिला विधानसभा (पनवेल)च्या उपाध्यक्षा हर्षदा कुलकर्णी, भाजप युवा मोर्चाचे महामंत्री श्री. गुलाबकुमार नाविक, धर्मप्रेमी श्री. अवदेश चौहान, हिंदु जनजागृती समितीच्या डॉ. ममता देसाई, श्री. वसंत सणस आणि श्री. रमेश सनिल उपस्थित होते.

वासनांध वसतीगृहचालकाला अटक  

लैंगिक अत्याचारप्रकरणी ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या तक्रारीनुसार वसतीगृह चालवणारा राजकुमार येशुदासन याच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे. ‘ईश आराधना’ आणि सेवाभावी कार्याच्या नावाखाली ख्रिस्ती संस्थांमध्ये चालू असलेली वासनांधता मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेविषयी समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून सर्व दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

संपादकीय भूमिका

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून आरोपींवर कारवाई का करत नाहीत ?