चीनने लडाख सीमेपासून त्यांची लढाऊ विमाने दूर ठेवावीत ! – भारताची चीनला चेतावणी

नवी देहली – भारताने लडाख येथील सीमेवर चीनकडून त्याचे लढाऊ विमान उडवण्याच्या प्रकरणी चीनला चेतावणी दिली आहे. ‘चीनने त्याची विमाने सीमेपासून दूर ठेवावीत’, असे भारताने चीनला सांगितले आहे. या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या दोन्ही देशांच्या सैन्याधिकार्‍यांच्या बैठकीत ही चेतावणी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी चीनचे लढाऊ विमान भारताच्या सीमेच्या अगदी जवळ आले होते. चीन तैवानच्या सीमेपासून १६ किलोमीटर अंतरावर सैनिकी सराव करत आहे.

या संदर्भात वायूदलप्रमुख व्ही.आर्. चौधरी म्हणाले की, भारत सातत्याने चीनच्या सीमेवर लक्ष ठेवून आहे. आम्ही येथे आमची लढाऊ विमाने, तसेच ‘रडार’ तैनात केले आहेत. याद्वारे आकाशात होणार्‍या हालचालींवर लक्ष ठेवता येईल.

संपादकीय भूमिका

चीन अशा चेतावण्या गांभीर्याने घेण्याची शक्यता अल्प असल्याने भारतानेही स्वतःची लढाऊ विमाने चीनच्या सीमेजवळ उडवावीत आणि ‘जशास तसे’ प्रत्युत्तर द्यावे !