पुणे जिल्ह्यामध्ये मनमंदिरात भक्तीरूपी ज्योत प्रज्वलित करणारा गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

gurupournima
गुरुपौर्णिमा महोत्सव

पुणे, २१ जुलै (वार्ता.) – गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! आषाढ पौर्णिमेचा हा दिवस साधकांच्या मनात भक्तीरूपी ज्योत प्रज्वलित करणारा अन् पुढील वर्षभरासाठी अखंड चैतन्य प्रदान करणारा असतो. हीच अनुभूती सनातनच्या साधकांसह समाजातील जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांनी यंदाच्याही गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेतली. ‘सनातन संस्थे’च्या वतीने १३ जुलै या दिवशी पुणे येथील चिंचवड, कोथरूड, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, जुन्नर, शिरवळ, तळेगाव या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा प्रतिष्ठान’चे श्री. विद्याधर नारगोलकर, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता नीलेश निढाळकर, ‘वीर सावरकर युवा विचार मंच’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर, ‘पनून कश्मीर’चे श्री. राहुल कौल आदींनी उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सहस्रोंच्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते.

रहाटणी (चिंचवड) येथील गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित जिज्ञासू

या महोत्सवात समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार, ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन झाले, तसेच ‘स्वरक्षण प्रात्यक्षिके’ हे विशेष आकर्षण ठरले. या वेळी विविध विषयांवरील आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात आले होते.

सिंहगड रस्ता येथे सात्त्विक उत्पादने पहातांना जिज्ञासू

मान्यवरांचे राष्ट्र आणि धर्म विषयक विशेष मार्गदर्शन

सनातनचे साधक हिंदु राष्ट्रासाठी करत असलेले प्रयत्न आदर्शवत ! – विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा प्रतिष्ठान

श्री. विद्याधर नारगोलकर

हलालसारखी आर्थिक समांतर घातक व्यवस्था निर्माण होत असतांना सनातनचे साधक तिला जीव तोडून विरोध करत आहेत. ‘हिंदु राष्ट्र व्हावे’, हाच त्यांचा ध्यास आहे. ‘कसलाही कर्तेपणा न घेता कार्याचे सगळे श्रेय श्रीकृष्णाला समर्पित करणे’, हे सनातनच्या साधकांचे उत्कृष्ट उदाहरण आहे, असे मत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा प्रतिष्ठान’चे श्री. विद्याधर नारगोलकर यांनी व्यक्त केले. ते धनकवडी येथील वीणकर सभागृहात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.

संतांच्या संकल्पाने हिंदु राष्ट्र येणारच आहे ! – ह.भ.प. संजय खुटवड महाराज

सनातन संस्था एकमेव संस्था आहे, जी धर्माची बाजू ठामपणे मांडते आणि संस्थेला साक्षात् गुरुदेवांचा आशीर्वाद आहे. संकल्पाचा दाता हा साक्षात् श्रीमन्नारायण आहे. श्रीमन्नारायण आणि संत यांच्या संकल्पाने हिंदु राष्ट्र येणारच आहे, असे मत ह.भ.प. संजय खुटवड महाराज यांनी व्यक्त केले. ते शिरवळ येथील ‘कै. तुकाराम संतोबा कबुले सांस्कृतिक भवन कार्यालय’ येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.

आंतरिक साधनेसह समष्टी साधना केल्यानेच आपली आध्यात्मिक उन्नती होईल ! – राहुल कौल, पनून कश्मीर

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पनून काश्मीरचे श्री. राहुल कौल

आम्हाला काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले, आता तीच स्थिती देशाच्या कानाकोपर्‍यात होत आहे. हिंदु केवळ स्वतःच्या उन्नतीसाठी व्यस्त आहे, तर जिहादी संपूर्ण विश्व इस्लामिक करण्यासाठी व्यस्त आहेत. हिंदूंनी ‘मी भले आणि माझे घर भले’ ही मानसिकता आता सोडायला हवी. सनातन संस्थेचे ‘हिंदु राष्ट्रा’चे जे ध्येय आहे, त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून आध्यात्मिक चैतन्य ग्रहण करून समाजात कार्य करण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. आपण व्यष्टी साधनेसह समष्टी साधना केली, तरच आपल्याला मोक्ष मिळेल, साधना करून आपल्याला स्वतःमधील आध्यात्मिक शक्ती जागृत करायची आहे, असे प्रतिपादन पनून कश्मीरचे श्री. राहुल कौल यांनी केले. ते रहाटणी (चिंचवड) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते. या वेळी ६८५ जिज्ञासू उपस्थित होते.

स्त्रियांना पुरुषांपेक्षा उच्चस्थान केवळ हिंदु धर्मातच ! – अधिवक्त्या मृणाल साखरे

स्त्रियांना पुरुषांपेक्षा उच्चस्थान केवळ हिंदु धर्मातच आहे. ‘स्त्रियांना हिंदु समाजात दुय्यम स्थान होते’, असे साम्यवादी शिक्षणप्रणालीने आम्हाला चुकीचे शिकवले आहे. रामायणात कैकयीने दशरथ राजाला युद्धात स्वतः युद्धभूमीत जाऊन साहाय्य केले. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज कैदेत असतांना पूर्ण राज्यकारभार सांभाळला. ‘स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत होत्या’, हा इतिहास आहे, असे प्रतिपादन अधिवक्त्या मृणाल साखरे यांनी तळेगाव येथील अपूर्वा गार्डन मंगल कार्यालय येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.

हिंदूंचा सामूहिक स्वाभिमान जागृत झाल्यास भारत हिंदु राष्ट्र होईल ! – नीलेश निढाळकर, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता

भारताला प्राचीन हिंदु धर्माचा समृद्ध वारसा लाभल्याने भारत हा जगाचा आध्यात्मिक गुरु आहे; मात्र सध्या देशात हिंदु धर्माची निंदा केली जात असून ही निंदा करणारे आपलेच धर्मबांधव आहेत. त्यांना रोखण्यासाठी संसदेत कायदा करायला हवा. भारतामध्ये हिंदु बहुसंख्य असले, तरी जगात अल्पसंख्य आहेत. भारतात बहुसंख्य हिंदूंना अल्पसंख्य धर्मांध त्रास देत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु समाज जागृत व्हायला हवा. हिंदूंचा सामूहिक स्वाभिमान जागृत झाल्यास भारत हिंदु राष्ट्र होईल, असे प्रतिपादन प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता नीलेश निढाळकर यांनी केले. ते एरंडवणे येथील श्री गणेश सभागृहात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे ! – डॉ. नीलेश लोणकर, संस्थापक अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच

डॉ. नीलेश लोणकर

सध्या राष्ट्र आणि धर्म यांना नष्ट करण्याचे विभिन्न प्रयत्न चालू आहेत. मंदिर तोडणे, मूर्ती फोडणे, महिलांवर अत्याचार, राजसत्ता हस्तगत करणे, गोहत्या, नगरांची नावे पालटणे, इतिहासाचे विकृतीकरण अशा अनेक प्रकारांनी राष्ट्र आणि धर्म यांवर आघात होत आहेत. ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, धर्मांतर, हलाल प्रमाणपत्राची सक्ती आदी आघात तर आपल्या घरापर्यंत पोचले आहेत. त्यामुळे ‘राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण करा’, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेले विचार आता सत्यात उतरवायची आवश्यकता आहे. साधना केल्यास हिंदु राष्ट्र निर्माण होणे सहज शक्य आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वांनी प्रयत्नरत रहायला हवे, असे मत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी व्यक्त केले. ते सिंहगड रस्ता येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते.

वैशिष्ट्यपूर्ण

१. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी अन् ‘सनातन प्रभात’चे वाचक असे एकूण ९ जिज्ञासू सेवेत सहभागी झाले होते.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्रफीत पाहिल्यावर उपस्थित जिज्ञासूंची भावजागृती झाली.

३. इंदुमती नलावडेआजी (वय ७६ वर्षे) या दीड किलोमीटर अंतरावरून दिवसभर पाऊस असूनही चालत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या.

४. पाऊस असूनही १५ किलोमीटर लांब असलेल्या येडगाव येथील ३ जिज्ञासू त्यांच्यासह कुटुंबातील १० जणांना घेऊन कार्यक्रमाला आले होते.

गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये साहित्य उपलब्ध करून साहाय्य करणारे हितचिंतक

सर्वश्री जयवंत ढगे, अभिजित चव्हाण, विकास काळे, शंकर निगडे, राजेंद्र गोसावी, तुषार निगडे, सुनील सावंत, देवरामशेठ मेहेर, चंद्रकांत नखाते, गणेश नखाते, महेश मंडपवाले, दीपक गोखले, सुरेश रानडे, भाग्येश बंगाळे, बाबासाहेब गायकवाड, यज्ञेश्वर ठकार, गणेश कुलकर्णी, श्रीमती स्मिता शेळके, श्री. चाफेकर, ‘साई केटरर्स’चे मालक श्री. सुनील डिंगोरकर, माजी नगरसेवक श्री. कैलास थोपटे आदींनी गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी विविध साहित्य उपलब्ध करून दिले.

पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांना उपस्थित विविध पदाधिकारी आणि मान्यवर !

भाजपचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, चिंतामणी प्रासादिक दिंडी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ह.भ.प. दत्ताभाऊ चोरगे, राधाकृष्ण मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अंकुश जगताप, पुरोहित ब्राह्मण संघाचे दत्तात्रय कुलकर्णी, श्रीमती सविता खुळे, माजी नगरसेवक श्री. कैलास थोपटे, अनंत कोर्‍हाळे, गिरीश खेर, भाजपचे नगरसेवक श्री. सुरेश भोईर, उर्से येथील सरपंच भारती गावडे, उर्से ग्राम सदस्य श्री. सतीश कारके, माजी नगरसेविका सुजाता खेर, नगरसेवक जयंत भावे, भाजपच्या माजी नगरसेविका सौ. शशिकला शिवराम मेंगडे, सौ. मंजुश्री खर्डेकर, तसेच श्रीमती सविता खुळे आदी पदाधिकारी आणि मान्यवर पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांना उपस्थित होते.

सिंहगड रस्ता येथे गुरुपूजन करतांना डावीकडून सौ. स्नेहल पाटील, श्री. केतन पाटील आणि श्री. शहाणे गुरुजी
सिंहगड रस्ता येथील गुरुपौर्णिमेमध्ये स्वरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर करतांना कार्यकर्ते
सातारा रस्ता येथे श्री. विद्याधर नारगोलकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना श्री. विलास पाटील
अधिवक्ता नीलेश निढाळकर (डावीकडे) यांचा सत्कार करतांना श्री. सुधीर तावरे
ह.भ.प. संजय खुटवड महाराज (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना श्री. सांडभोर