कन्हैयालाल यांची नृशंस हत्या, ही भारतीय राज्यघटनेची हत्या ! – हिंदु युवा मंच

दुर्ग (छत्तीसगड) येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा

दुर्ग (छत्तीसगड) – राष्ट्रवादी विचारसणी असलेल्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार स्वतःचे मत व्यक्त करणार्‍या कन्हैयालाल यांची नृशंस हत्या, ही भारतीय राज्यघटनेची हत्या आहे, असे प्रतिपादन हिंदु युवा मंचचे स्थानिक प्रमुख श्री. गोविंदराज नायडू यांनी केले.

उदयपूर येथे २८ जून या दिवशी जिहाद्यांनी केलेल्या कन्हैयालाल यांच्या शिरच्छेदाच्या विरोधात येथील हिंदु युवा मंचकडून मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. मोर्च्यामध्ये शेकडो हिंदू सहभागी झाले होते. यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी जिल्हाधिकार्‍यांना राष्ट्रपतींच्या नावाने ‘कन्हैयालाल यांची हत्या करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी’, या मागणीचे निवेदन दिले.

श्री नायडू पुढे म्हणाले की, या हत्येच्या माध्यमातून भारतातील १०० कोटी हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा घटनांच्या माध्यमातून भारताचे तालिबानीकरण करण्याच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना काढणे आवश्यक आहे.

मोर्च्यामध्ये हिंदु युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष श्रीकुमार नायर, महामंत्री राजेश शर्मा, जिल्हा आयोजन समितीचे सदस्य अरुण सिंह, राजा देवांगन, सुरेंद्र जैन, शिवम सिंह, हितेंद्र राजपूत, शिबू सोनी, मंगल, जय देवांगन, दीपक, बंटी उपरीकर, राज गुप्ता, नीरज देवांगन, रोशन राजपूत, बलराम पांडेय, मय्यू चंद्राकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.