ज्या मशिदींतून दगडफेक होते, त्यांना टाळे ठोका !

  • काशी धर्म परिषदेत संत-महंतांची मागणी

  • मागण्या मान्य न झाल्यास नागा साधू रस्त्यावर उतरून आंदोलन करणार

काशी धर्म परिषदेने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित संत-महंत

वाराणसी (उत्तरप्रदेश) – देशात शुक्रवारच्या नमाजानंतर होणार्‍या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर काशी धर्म परिषदेने आयोजित केलेल्या बैठकीत एकूण १६ ठराव संमत करण्यात आले. हे ठराव देशातील धर्माचार्य, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना पाठवण्यात येणार आहेत. या प्रस्तावामध्ये विशेषतः नूपुर शर्मा यांच्यावर बलात्कार करण्याची धमकी देणार्‍या आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करावी, शुक्रवारच्या नमाजानंतर ज्या मशिदींमधून दगडफेक केली जाते, त्या सर्व मशिदींना टाळे ठोकावे, ज्ञानवापीच्या प्रकरणी सत्य जगासमोर सांगणारे मुसलमान सरकारी कर्मचारी बाबा यांना कायमस्वरूपी संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. ‘जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर नागा साधू रस्त्यावर उतरून आंदोलन करतील’, अशी चेतावणीही देण्यात आली.

वाराणसीच्या सुदामा कुटी येथे पातालपुरी मठाचे महंत बालक दास यांच्या अध्यक्षतेखाली काशी धर्म परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. नमाजानंतर होणार्‍या दगडफेकीला या बैठकीत ‘इस्लामी आतंकवाद’, असे संबोधण्यात आले. ‘ज्या प्रमाणे इस्लामी जिहादी नमाजपठणानंतर रस्त्यावर उतरून देशात जाळपोळ करत आहेत, ते संत समाज कदापि सहन करणार नाही’, अशी चेतावणीही देण्यात आली.

आम्ही सर्व पंथ, आखाडे आणि नागा साधू यांना एकत्र करून मोठा निर्णय घेऊ ! – महंत बालक दास

महंत बालक दास यांनी म्हटले की, देश जळत आहे, आमची मंदिरे पाडली जात आहेत, तसेच आमच्या देवतांचा प्रतिदिन अवमान केला जात आहे. आम्ही जिहाद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहोत. देश जळण्यापासून वाचवण्यासाठी संत समाज रस्त्यावर उतरेल. आम्ही सर्व पंथ, आखाडे आणि नागा साधू यांना एकत्र करून मोठा निर्णय घेऊ.

बैठकीला उपस्थित संत-महंत !

सुदामा कुटीचे महंत राघव दास, रामजानकी मठाचे (बुलानाला) महंत अवधकिशोर दास, महंत अवधेश दास, रामपंथाचे पंथाचार्य डॉ. राजीव, महंत प्रमोद दास, महंत सत्यनारायण, नारायण दास, डॉ. श्रवण दास, महंत रामेश्‍वर दास, महंत रामशरण दास, महंत सियाराम दास, कोतवाल मोहन दास, कोतवाल विजय दास, महंत ईश्‍वर दास, महंत सर्वेश्‍वर शरण दास, महंत चंद्रभूषण दास, महंत वैभव गिरि, तांडव महाराज, रामेश्‍वर दास आणि महंत श्रीराम दास