विरांगनेप्रमाणे मला मृत्यू येत आहे ! – राणी लक्ष्मीबाई

आज ७ जून २०२२ या दिवशी राणी लक्ष्मीबाई बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…

‘वर्ष १७८० मध्ये ज्येष्ठ शुक्ल ७ या दिवशी झाशीच्या लक्ष्मीबाईंनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमरांत आत्मबलीदान केले.

‘हातात तलवार आणि कुडीत प्राण आहे तोपर्यंत झाशी माझी आहे’, अशी राणीची प्रतिज्ञा होती; परंतु ह्यू रोझ याने झाशीस वेढा दिलेला परतवता न येऊन राणी ग्वाल्हेरला आली. तेथेही शत्रूचा वेढा पडला. शत्रूची फळी फोडून जाण्याचा प्रयत्न तिने केला. दोन इंग्रज शिपाई तिच्या पाठीमागे धावत होते. वाटेत एक नाला आला. राणीचा घोडा पैलतीर गाठू शकला नाही. स्वतःचा देह जिवंतपणे दुसऱ्याच्या हाती जाऊ नये, ही भारतीय स्त्रीची वृत्ती राणीमध्ये उसळून वर आली. यासाठी तिने तिची रक्ताने न्हालेली तलवार सरसावली. एका शिपायाने पुढून राणीवर वार केला. दुसऱ्याने मागून केला. राणीचे शरीर रक्ताने माखून गेले. उग्ररूप धारण करून शेवटचा प्रयत्न तिने केला. दोनही शिपाई मारल्यानंतर रणशालिनी लक्ष्मी फिकी पडली. राणीने शेवटचे वाक्य उच्चारले, ‘‘वीरांगनेप्रमाणे मला मृत्यू येत आहे.’’ तिच्या मुखावर थोडा उल्हास उमटला आणि या भारतीय स्वातंत्र्यलक्ष्मीने आपले डोळे मिटले.

(साभार : ‘दिनविशेष’)