मशिदींमधील आतंकवादी शोधण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस यांनी कधी मोहीम राबवली का ? – राज ठाकरे

मुंबई, १० मे (वार्ता.) – मागील आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांना दडपण्यासाठी राज्य सरकार पोलीसबळाचा वापर करत आहे. हे पहाता मला प्रश्न पडला आहे की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि आतंकवादी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकार किंवा पोलीस यांनी कधी राबवली होत का ? असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. राज ठाकरे यांनी १० मे या दिवशी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून ही विचारणा केली आहे.

या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केले. त्यानंतर महाराष्ट्र सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखे वागत आहे. देशाचे सर्वाेच्च न्यायालय आणि विविध राज्यांतील उच्च न्यायालये यांनी दिलेल्या निर्णयांवर कार्यवाही व्हावी, यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन घोषित केले. आंदोलन करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. एकूण २८ सहस्र महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्या. सहस्रावधींना तडीपार केले आणि अनेकांना कारागृहात डांबले. हे कशासाठी ? ध्वनीप्रदूषण करणारे आणि लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी. अर्थात महाराष्ट्र सैनिकांच्या विरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना कुणी दिला ? हे समस्त मराठी आणि हिंदू जन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. राज्य सरकारला माझे एकच सांगणे आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही.’’