ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार

तुर्भे – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मागील ५ वर्षांत जे काम झाले आहे, त्याची चौकशी करण्याचे आदेश पणन संचालक शरद जरे यांनी दिले आहेत. यासाठी  ४ सदस्यीय विशेष चौकशी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाला २ मासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज, वर्ष २०२१-२०२२ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील लेख्यांची पडताळणी करणे, लेखापरिक्षण विहीत मुदतीत पूर्ण होऊन त्याचा दोषदुरुस्ती अहवाल सादर न करणे, तसेच सदर लेखापरिक्षण आणि दोषदुरुस्ती सादर न झाल्याची कारणे, तसेच संबंधित दायित्व व्यवस्थापन यांची चौकशी करणे, बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाली नसल्याची कारणमीमांसा करून दायित्व निश्चित करणे, आयात-निर्यात कक्ष स्थापन करणे, किरकोळ विक्री व्यवसाय चालू नाही ना, अनुज्ञप्त्या आदी गोष्टी पडताळणे यांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

ही चौकशी त्या त्या वेळीच होणे आवश्यक आहे आणि संबंधित दोषींवर कारवाई होणेही आवश्यक आहे !