पुढील आठवड्यात महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला आदेश

नवी देहली – पुढील आठवड्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घोषित करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिला. मार्च २०२० च्या जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. राज्यातील १८ महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदा यांसह अनेक नगरपंचायती अन् ग्रामपंचायती यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्यातील १८ महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेच्या गोंधळानंतर ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.

अशा परिस्थितीत ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने नवीन विधेयकाद्वारे कायदा संमत करत राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्या याचिकेवर २५ एप्रिल या दिवशी सुनावणी झाली होती. यासंदर्भातील अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.