काश्मीरमध्ये गेल्या ११ दिवसांत ६ हिंदूंवर आतंकवादी आक्रमणे

काश्मीरमधील राजपूत कुटुंबे पलायन करण्याच्या विचारात !

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद अद्यापही संपलेला नाही, हेच वास्तव आहे. तो संपवण्यासाठी पाकला संपवणेच आवश्यक आहे, हे शासनकर्त्यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये गेल्या ११ दिवसांत सहाव्यांदा हिंदूंवर आक्रमण झाल्याने राज्यात रहाणारे राजपूत घाबरले असून ते काश्मीर सोडण्याचा विचार करत आहेत. सतीशकुमार सिंह हे ५५ वर्षीय चालक आतंकवाद्यांच्या आक्रमणात ठार  झाल्यानंतर राजपूत आता हा विचार करत आहेत. विशेष म्हणजे १९९० च्या दशकात आतंकवाद मोठ्या प्रमाणात फोफावला असतांना येथील रजपूत समाजाने काश्मीर सोडला नव्हता. कुलगाम आणि शोपिया जिल्ह्यांतील काही भागांत राजपूत कुटुंबे रहातात. ही कुटुंबे सफरचंदाचा व्यापार करतात.

१. कुलगामच्या काकरान गावाचे प्रमुख जगदीश सिंह यांनी म्हटले, ‘मुसलमानांना जर आमच्यापासून त्रास होत असेल, तर आम्ही येथून जाण्यास सिद्ध आहोत. गावातील काश्मिरी मुसलमान मला येऊन ‘आम्ही तुमच्यासमवेत आहोत’, असे सांगत आहेत. ‘घाबरू नका, तुम्ही आमचे भाऊ आहात’, असे सांगत आहेत.’ (काश्मिरी हिंदूंच्या शेजारी रहाणारे धर्मांध हे नेहमीच हिंदूंना ‘आम्ही तुमच्या समवेत आहोत, तुमच्यावर अन्य गावांतील आमचे धर्मबांधव आक्रमण करतात’, असे सांगून हिंदूंना फसवतात. अशा भूलथापांना हिंदूंनी बळी पडू नये ! – संपादक)  

२.  सतीश यांच्या हत्येनंतर काश्मिरी कॉलनीमध्ये एक चिठ्ठी सापडली. ‘लश्कर ए इस्लाम’ नावाच्या आतंकवादी संघटनेने ही चिठ्ठी एका घरावर चिकटवली आहे. यामध्ये ‘एकतर काश्मीर सोडा किंवा मरण्यास सिद्ध रहा’ अशी धमकी देण्यात आली आहे.