सद्गुरु सत्यवान कदम (वय ५९ वर्षे) यांच्या सान्निध्यामुळे साधकांना स्वतःत जाणवणारे पालट आणि त्यांच्या सत्संगामुळे येणार्‍या अनुभूती

सद्गुरु सत्यवान कदम यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

उद्या चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा (२.४.२०२२) या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांचा ५९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

उद्या चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा (२.४.२०२२) या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांचा ५९ वा वाढदिवस आहे. ते सध्या कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात रहात आहेत. तेथील साधकांना सद्गुरु सत्यवानदादा यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. श्री. सुरेंद्र चाळके

श्री. सुरेंद्र चाळके

१ अ. सद्गुरु सत्यवान कदम यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१ अ १. नीटनेटकेपणा : सद्गुरु सत्यवानदादांची कुडाळ सेवाकेंद्रातील खोली पुष्कळ सुंदर, नीटनेटकी, स्वच्छ आणि टापटीप असते. खोलीतील प्रत्येक वस्तू त्या त्या ठिकाणी ठेवलेली असते. त्यातून त्यांचा ‘नीटनेटकेपणा’ हा गुण शिकायला मिळतो.

१ अ २. विरक्त असणे : सद्गुरु दादांच्या रहाणीमानावरून ‘त्यांना आता कसलीच अपेक्षा उरलेली नाही’, असे मला जाणवते. ते कोणतीही परिस्थिती स्वीकारतात. तेव्हा ‘ते वैराग्यभावात आहेत’, असे मला जाणवते.

१ अ ३. दास्यभक्ती : सद्गुरु दादांकडे पाहिल्यावर मला मारुतिराया आणि त्याची दास्यभक्ती यांची आठवण होते अन् माझा मारुतीचा नामजप चालू होतो. सद्गुरु दादांच्या प्रत्येक कृतीतून दास्यभाव दिसून येतो आणि साक्षात् मारुतिरायाची अनुभूती येते.

१ अ ४. एकाग्रतेने ध्यान करणे : सद्गुरु दादा खोलीत ध्यानस्थ बसतात. मी त्यांच्या खोलीत पाणी किंवा अन्य साहित्य ठेवून येतो, तरी त्यांची एकाग्रता भंग पावत नाही. तेव्हा ‘ते ध्यानयोगी आहेत’, असे मला वाटते.

१ अ ५. परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा : सद्गुरु दादांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. ते नेहमी नामजप करत भावाच्या स्थितीत असतात. तेव्हा ‘ते भक्तीयोगी आहेत’, असे मला जाणवते.

१ आ. सद्गुरु सत्यवानदादांमुळे साधकात पालट होऊन त्याची साधना चांगली होऊ लागणे : सद्गुरु सत्यवानदादा साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्या वेळी मला त्यांच्या आवाजामध्ये नम्रता, प्रेम आणि साधकांना पुढे घेऊन जाण्याची तळमळ जाणवते. सद्गुरु दादांमुळे माझ्यात आपोआप पालट होत आहेत. आता माझी व्यष्टी साधना चांगली होत आहे.

१ इ. अनुभूती

१. एकदा माझ्या मनावर एका प्रसंगाचा ताण आला होता. ‘त्याविषयी सद्गुरु दादांना सांगावे’, असा विचार मनात आल्यावर माझा ताण हळूहळू न्यून झाला. त्यांना ताणाचा प्रसंग सांगितल्यावर ताण पूर्णपणे नष्ट झाला.

२. सद्गुरु दादांचे कपडे कापसाप्रमाणे मऊ झाले आहेत. त्यांच्या कपड्यांना इस्त्री करत असतांना ‘कपड्यांना सुगंध येत आहे’, अशी अनुभूती येते.

१ ई. सद्गुरु दादांच्या खोलीतील लाद्यांमध्ये झालेले पालट ! : सद्गुरु दादांच्या खोलीतील लाद्या गुळगुळीत झाल्या आहेत. त्यांच्या खोलीत चालतांना पायाला लादी ‘स्पंज’प्रमाणे मऊ लागते. (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील लाद्याही तशाच झाल्या आहेत. – संकलक)

१ ई. सद्गुरु दादांच्या खोलीत येणार्‍या अनुभूती

१. सद्गुरु दादांच्या खोलीत गेल्यावर नामजप आपोआप चालू होतो.

२. त्यांच्या खोलीत गेल्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण आपोआप दूर होते.

३. खोलीत स्वयंसूचना सत्र (स्वभावदोष न्यून होण्यासाठी मनाला द्यायची सूचना) आणि नामजप करायला बसल्यावर तो एकाग्रतेने होतो.

१ ऊ. सद्गुरु दादांमध्ये झालेले दैवी पालट : सद्गुरु दादांचे हात आणि चरण यांवर चकाकी आली आहे. (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हात आणि चरण यांवर चकाकी आली आहे. – संकलक)

एकदा कर्नाटकातील एक संत कुडाळ सेवाकेंद्रात आले होते. सेवाकेंद्र पहातांना ते मला म्हणाले, ‘‘हे सेवाकेंद्र एका महात्म्यामुळे उभे आहे.’’ तेव्हा ‘तो महात्मा, म्हणजे सद्गुरु दादाच आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

२. सौ. अर्चना घनवट

सौ. अर्चना घनवट

२ अ. सद्गुरु सत्यवान कदम यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि त्यांच्या सत्संगामुळे साधिकेला स्वतःत जाणवलेले पालट

२ अ १. सद्गुरु सत्यवानदादांच्या सत्संगात पुष्कळ हलके वाटून ‘मनातील सर्व सांगावे’, असे वाटणे आणि सत्संगानंतर सेवेतील उत्साह अन् आनंद वाढणे : मी कुडाळ येथील सेवाकेंद्रात सेवेला गेले. तेव्हा माझ्या मनाची स्थिती गोंधळलेली होती आणि मनावर दडपण होते. सद्गुरु दादा साधकांचा स्वभावदोष निर्मूलन सत्संग घ्यायचे. ते सत्संग घ्यायला आल्यावर वातावरणात पालट होऊन मला पुष्कळ हलके वाटायचे. माझ्याकडून सत्संगात सूत्रे सहजतेने सांगितली जायची आणि चुकांविषयी खंत वाटून ‘मनातील सर्व सांगावे’, असे वाटायचे. माझे मन एकाग्र आणि स्थिर व्हायचे. सत्संग झाल्यावर मला हलकेपणा जाणवायचा. त्यामुळे माझा सेवेतील उत्साह आणि आनंद वाढला.

२ अ २. अंतर्मुखता वाढणे : सद्गुरु दादांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात माझ्यातील तीव्र स्वभावदोष आणि अहं यांविषयी सांगितल्यावर माझी अंतर्मुखता वाढली. त्यामुळे ‘माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता न्यून होत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

२ अ ३. सद्गुरु दादांना मनातील अयोग्य विचार सांगितल्यावर ते क्षणात नाहीसे होणे : एकदा मी माझ्या मनात येणारा एक अयोग्य विचार सद्गुरु दादांना सांगून त्यांची क्षमायाचना केली. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आपल्या चित्तावर अनेक जन्मांचे संस्कार असतात आणि वेळप्रसंगी ते उफाळून येतात. त्या प्रसंगाकडे अधिक लक्ष द्यायला नको.’’ तेव्हा एका क्षणातच मनातील सर्व विचार नाहीसे झाले.

२ अ ४. साधिकेने सद्गुरु दादांना ‘अस्थिरता’ आणि ‘त्याच त्याच विचारांमध्ये अडकणे’ या तिच्या स्वभावदोषांविषयी सांगितल्यावर त्यांनी ‘तुम्ही शिकण्याची वृत्ती वाढवा. ती वाढल्यावर स्थिरता येते’, असे सांगणे : माझ्यात पुष्कळ अस्थिरता आहे. एखादा प्रसंग घडल्यावर मी घंटोन्घंटे त्याच विचारांमध्ये अडकते आणि माझे विचार वाढतात. त्यावर सद्गुरु दादा मला म्हणाले, ‘‘तुम्ही शिकण्याची वृत्ती वाढवा. ती वाढल्यावर स्थिरता येते. ‘मी विद्यार्थी दशेत आहे’, असा विचार करून शिकण्यातील आनंद घ्यायचा. ‘मला सर्व ठाऊक आहे’, असे वाटत असेल, तर शिकण्यातील आनंद घेता येणार नाही. ‘मला काही येत नाही’ किंवा ‘मला काही कळत नाही’, असा भाव ठेवायचा.’’ तेव्हापासून माझी प्रसंगांकडे बघण्याची दृष्टी पालटली. पूर्वीच्या तुलनेत माझी सकारात्मकता वाढली आहे.

२ आ. अनुभूती

१. सद्गुरु सत्यवानदादा सत्संग घ्यायला आल्यावर माझा नामजप आपोआप चालू होतो.

२. सद्गुरु दादा व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना अनेकदा मला परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होते आणि ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांनाच आढावा देत आहे’, असे जाणवते.

३. एकदा मी माझ्या मनात आलेला एक अयोग्य विचार सद्गुरु दादांना सांगून त्यांची क्षमायाचना केली. तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टरांचे विराट रूपात दर्शन झाले.

३. सौ. जयंती परब

सौ. जयंती परब

३ अ. ‘सद्गुरु दादांच्या चरणी मन मोकळे करावे’, असे वाटणे : प्रारंभी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात मला मोकळेपणाने चुका सांगता यायच्या नाहीत; पण सद्गुरु सत्यवानदादांचा वात्सल्यभाव अनुभवल्यावर ‘मला त्यांच्या चरणी मन मोकळे करावे’, असे वाटू लागले. त्यांना आत्मनिवेदन केल्यावर माझ्या मनाला आनंद मिळू लागला.

३ आ. सद्गुरु दादांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर आध्यात्मिक त्रास उणावणे : कुडाळ येथील सेवाकेंद्रात येण्यापूर्वी आणि आल्यावरही मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होता. सद्गुरु सत्यवानदादांनी वेळोवेळी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे माझा त्रास उणावला आहे.

४. सौ. प्रार्थना राजेंद्र परब

सौ. प्रार्थना परब

४ अ. अहंशून्यता – स्वतःचे वेगळेपण न जपता शिष्यभावात रहाणारे सद्गुरु सत्यवान कदम !

४ अ १. स्वयंपाकघरातील सेवांत साहाय्य करणे : मध्यंतरी काही दिवस सेवाकेंद्रात साधकांची संख्या पुष्कळ अल्प होती. तेव्हा सद्गुरु दादा अन्नपूर्णा कक्षातील अनेक सेवांत सहभागी होत, उदा. फणस सोलणे, भाजी निवडणे, साधिकेला भाजी चिरून देणे.

४ अ २. स्वतः स्वच्छता करणे : एकदा मी एकटीच अन्नपूर्णा कक्षात सेवा करत होते. तेव्हा सद्गुरु दादांनी मला ‘सेवेत साहाय्य करू का ?’, असे विचारले. मी त्यांना ‘नको’, असे सांगितले. तेव्हा ते जिना झाडण्याची सेवा करायला लागले आणि अन्य एका साधकाला त्यांनी मला सेवेत साहाय्य करण्यासाठी पाठवले.

४ अ ३. सेवाकेंद्रात झालेल्या चुकांसाठी स्वतः प्रायश्चित्त घेऊन साधकांसमोर आदर्श ठेवणे : जून २०२१ मध्ये सद्गुरु ((सुश्री (कुमारी)) स्वाती खाडये आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी कुडाळ सेवाकेंद्रातील साधकांचा स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेतला होता. आम्हा साधकांकडून बर्‍याच गंभीर चुका झाल्या होत्या. त्या चुकांसाठी सद्गुरु सत्यवानदादांनी स्वतःही प्रायश्चित्त घेतले. त्यांनी ‘सकाळी लवकर ऊठून बाहेरील अंगणाची स्वच्छता करणे आणि सकाळचा अल्पाहार न घेणे’, हे प्रायश्चित्त घेतले.

४ आ. साधिकेच्या मनाची नकारात्मकता वाढल्यावर तिने स्वतःला ताण आल्याचे सद्गुरु दादांना कळवणे आणि सद्गुरु दादांनी लघुसंदेश पाठवून दृष्टीकोन दिल्याने तिची नकारात्मकता न्यून होणे : एप्रिल २०२० मध्ये माझ्या वैयक्तिक जीवनात झालेल्या एक प्रसंगामुळे मी घरी गेले होते. तेव्हा माझ्या मनाची नकारात्मकता वाढून ‘आता साधना करायची नाही आणि सेवाकेंद्रातही परत जायचे नाही’, असे विचार माझ्या मनात आले. त्यानंतर ४ दिवसांनी मी सद्गुरु दादांना लघुसंदेश पाठवून ‘मला ताण आला आहे’, असे कळवले. तेव्हा त्यांनी मला लघुसंदेश पाठवला, ‘झालेल्या गोष्टींचा विचार न करता स्वतःच्या प्रगतीसाठी काय आवश्यक आहे ?’, ते करायला हवे. ईश्वर काळजी घेईल !’ त्यांचा लघुसंदेश वाचून माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून झाले आणि काही दिवसांनी मी सेवाकेंद्रात परत आले.

४ इ. अनुभूती – सद्गुरु दादांच्या अस्तित्वाने मला चैतन्य मिळून माझा त्रास न्यून होतो.

५. सौ. अनुराधा पाटील

सौ. अनुराधा पाटील

५ अ. सद्गुरु सत्यवानदादांना दुखण्याविषयी सांगितल्यावर ते न्यून होणे : एकदा रात्री उशिरा अकस्मात् माझ्या पोटात असह्य कळा येऊ लागल्या. एका साधिकेने याविषयी सद्गुरु सत्यवानदादांना कळवले आणि त्याच क्षणापासून माझे दुखणे न्यून व्हायला आरंभ झाला.

५ आ. अनुभूती

१. मी सेवाकेंद्रात सद्गुरु दादांच्या खोलीच्या जवळील खोलीत निवासाला आले. तेव्हापासून मला पहाटे आपोआप जाग येऊन उत्साह वाटतो.

२. मी प्रार्थना करतांना माझ्याकडून माझ्या हृदयरूपी सिंहासनावर श्री गुरुदेवांच्या समवेत सद्गुरु दादा आणि अन्य सद्गुरु यांना आसनस्थ होण्यासाठी नकळत आवाहन केले जाते. तेव्हा ‘ते गुरुतत्त्व माझ्या हृदयात विराजमान झाले आहे’, या जाणिवेने मला पुष्कळ चांगले वाटते.

३. सद्गुरु दादांच्या प्रती सेवाकेंद्रातील सर्व साधकांच्या मनात पुष्कळ भाव आहे. तो भाव पाहून मागील काही मासांपासून मला ‘सद्गुरु दादा कुडाळ सेवाकेंद्रातील कृष्ण असून आम्ही सर्व जण गोप-गोपी आहोत’, असे जाणवते. त्या वेळी माझ्यात राधा आणि मीरा यांच्यासारखा भाव निर्माण होण्यासाठी नकळत प्रार्थना होते.

प्रार्थना आणि कृतज्ञता

‘गुरुमाऊली, आम्ही आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत. आमची काहीच पात्रता नसूनही आम्हाला सद्गुरु दादांचा सत्संग लाभत आहे. ‘हे गुरुमाऊली, हे सद्गुरु दादा, आपल्याला अपेक्षित अशी साधना आणि सेवा आमच्याकडून होऊ दे. आपल्या चरणी आमचे तन आणि मन समर्पित होऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

सर्व सूत्रांसाठी दिनांक (१०.३.२०२२)