हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता ! – ऋषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती, बेळगाव

बेळगाव येथे दोन दिवसांची हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा उत्साहात

कार्यशाळेत शिबिरार्थींना मार्गदर्शन करतांना डावीकडून श्री. सत्यविजय नाईक आणि श्री. ऋषिकेश गुर्जर (उजवीकडे)

बेळगाव, २५ मार्च (वार्ता.) – स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही स्वीकारली; मात्र गेल्या ७३ वर्षांत भ्रष्टाचार, तुष्टीकरण, धर्मांतर, गोहत्या, यांसह अनेक समस्यांनी भारत ग्रस्त आहे. या सर्वाला हिंदु राष्ट्र हेच उत्तर असून त्यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करण्याची आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. ऋषिकेश गुर्जर यांनी केले. येथील बझार गल्ली, वडगाव येथील बनशंकरी मंदिराच्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यशाळेत बेळगाव शहर, बसुर्ते, नंदिहळ्ळी, खानापूर, रामनगर येथून धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

कार्यशाळेचा प्रारंभ शंखनाद आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आला. कार्यशाळेचा उद्देश श्री. सत्यविजय नाईक यांनी सांगितला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. ऋषिकेश गुर्जर यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची मूलभूत संकल्पना, हिंदु राष्ट्र कसे स्थापन होईल आणि त्यासाठी काय प्रयत्न करायला हवेच यांविषयी सांगितले. कु. संगीता नाईक यांनी ‘जीवनात साधनेचे महत्त्व आणि प्रत्यक्ष कृती’ याविषयी विस्तृत माहिती दिली.

कार्यशाळेत सहभागी धर्मप्रेमी

शिबिरार्थींच्या कौशल्य वृद्धीविषयी प्रायोगिक भाग घेण्यात आला. त्यात आंदोलनासाठी अनुमती घेणे, सरकारीकरण झालेल्या मंदिराच्या विश्वस्तांना संपर्क करणे या कृतीच्या भागात शिबिरार्थींचा उत्साहपूर्ण सहभाग होता. हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमात आपण कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो, तसेच त्यामध्ये आपण आपले धर्मकर्तव्य म्हणून कोणकोणती सेवा करू शकतो याविषयी गटचर्चा घेण्यात आली.

क्षणचित्रे

१. शिबिराच्या दुसर्‍या दिवशी वरुणराजाने उपस्थिती दर्शवली. यातून वरुण देवता आशीर्वाद देण्यासाठी आल्याची अनुभती सर्वांनी घेतली.

२. एका धर्मप्रेमींनी कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी येऊ शकलो नाही, तर दुसर्‍या दिवशी कार्यक्रम पाहून पुष्कळ आनंद झाला, तसेच पहिला दिवस चुकल्याविषयी पुष्कळ खंत वाटली.