रशिया-युक्रेन युद्धाविषयी भारताने स्वत:चे हित पाहून निर्णय घ्यायला हवेत ! – (निवृत्त) मेजर जनरल जगतबीर सिंह, भारतीय सेना

‘रशिया-युक्रेन युद्ध : भारतावर काय होणार परिणाम ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

मुंबई – रशियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच भारताच्या बाजूने भूमिका मांडली आहे. संकटकाळात भारताला साहाय्य केले आहे. अगदी काश्मीर सीमावाद, कलम ३७० यांविषयीही त्याने भारताचे समर्थन केले आहे. भारताला नेहमी शस्त्रास्त्रे दिली आहेत. याउलट युक्रेनने नेहमी भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे. तसेच युक्रेनमध्ये सहस्रो नागरिक आणि विद्यार्थी अडकलेले आहेत. त्यांना वाचवणे महत्त्वाचे असल्यामुळे भारताला रशिया-युक्रेन युद्धाविषयी काळजीपूर्वक भूमिका घेतली पाहिजे आणि भारताचे हित पाहूनच पुढील पावले उचलली पाहिजेत, असे मत भारतीय सेनेतील (निवृत्त) मेजर जनरल जगतबीर सिंह यांनी व्यक्त केले.

(निवृत्त) मेजर जनरल जगतबीर सिंह

ते २ मार्च २०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘रशिया-युक्रेन युद्ध : भारतावर काय होणार परिणाम ?’, या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

रशियावर शत्रूराष्ट्रांनी आक्रमण न करण्यासाठी त्याच्याकडून अण्वस्त्रे वापरण्याची धमकी दिली ! – (निवृत्त) मेजर जनरल व्ही.के. सिंह

(निवृत्त) मेजर जनरल व्ही.के. सिंह

रशियावर ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) मधील सहभागी देशांनी लादलेले कडक आर्थिक निर्बंध आणि व्यापारावर बहिष्कार घातला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अण्वस्त्रे आक्रमण करण्याची चेतावणी दिली आहे. जेणेकरून शत्रूराष्ट्रांनी त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी एकत्र येऊ नये. जसे पाकिस्तानही भारताला ‘पाकमध्ये घुसून युद्ध केल्यास अण्वस्त्रे वापरू’, अशी धमकी देत असतो. त्याप्रमाणे रशियाने केले आहे.

युद्धाच्या परिस्थितीमुळे रशियाकडून भारताला युद्धसामुग्री मिळण्यास विलंब होऊ शकतो ! – (निवृत्त) कर्नल राजेंद्र शुक्ला

(निवृत्त) कर्नल राजेंद्र शुक्ला

सध्या चालू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे येणारा युद्धसामुग्रीवरील व्यय (खर्च) आणि त्यानंतर पाश्चात्त्य देशांनी रशियावर लादलेले निर्बंध यामुळे रशियाला पुष्कळ मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होणार आहे. रशियावरील आर्थिक निर्बंधामुळे रशियाकडून भारताला येणारे ‘एस् ४००’ हे क्षेपणास्त्र आणि क्षेपणास्त्रविरोधी तंत्रज्ञान, तसेच अन्य युद्धसामुग्री भारताला मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. कदाचित् युद्धामुळे ती प्राप्त होण्यास थोडा विलंब होईल; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची स्थिती जागतिक स्तरावर पूर्वीपेक्षा पुष्कळ चांगली झाली आहे. ते समतोल राखून भूमिका घेत आहेत. रशिया आणि भारत यांची परंपरागत मैत्री आहे अन् कठीण काळात रशियाने भारताला साहाय्य केले आहे, हेही भारताने लक्षात घ्यायला हवे.


हे पहा –

हिन्दू जनजागृति समिति आयोजित : ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ में “रशिया-युक्रेन युद्ध : भारत पर क्या होगा परिणाम ? | Russia-Ukraine War : What will be it’s effect on India ?”