अज्ञातांनी कागल (जिल्हा कोल्हापूर) येथील महावितरणचे कार्यालय पेटवले !

कोल्हापूर, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे महावितरण कार्यालयासमोर गेल्या २ दिवसांपासून ठिय्या आंदोलन चालू आहे. याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतून अज्ञात शेतकर्‍यांनी महावितरणचे कागल येथील कार्यालय पेटवले. या आगीत काही कागदपत्रे जळाली आहेत. ‘शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतकर्‍यांनी कार्यालय पेटवले’, असे ट्वीट शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

या संदर्भात राजू शेट्टी म्हणाले, ‘‘शेतीसाठी दिवसा १० घंटे वीजपुरवठा मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही. महावितरणच्या वीजनिर्मितीमध्ये साखर कारखान्यापेक्षाही मोठा घोटाळा आहे. तो लवकरच चव्हाट्यावर आणू. वीजनिर्मिती आस्थापनेत मंत्र्यांचे लागेबांधे आहेत. जनतेच्या पैशाची महाविकास आघाडी सरकारकडून लूट चालू आहे.’’