मुंबई येथील गोरक्षक आशिष बारीक यांच्यावर आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

अखिल भारत कृषी गोसेवा संघ आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

निवेदन देण्यासाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

सोलापूर, २७ जानेवारी (वार्ता.) – मुंबईतील गोरक्षक आशिष बारीक यांच्यावर आक्रमण करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार कठोर कारवाई न केल्यास सोलापूर येथील गोरक्षक, गोसेवक, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी अखिल भारत कृषी गोसेवा संघ आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिली.

या वेळी अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा संयोजक ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण, राष्ट्रीय गोरक्ष संघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर हिरेमठ, जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार मुनोळी, श्रीराम जन्मोत्सव समितीचे अक्षय अंजीखाणे, शीलवंत छापेकर, प्रवीण गलांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ दिनांक ४ मार्च २०१५ पासून राज्यात लागू केला आहे; मात्र हा कायदा केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिला. त्याची पूर्ण कार्यवाही होतांना दिसत नाही; कारण आजही कसाई कायद्याचे उल्लंघन करत सर्व नियम धाब्यावर बसवत कुणालाही न जुमानता उघडपणे गोवंशियांची तस्करी आणि हत्या करत आहेत.