राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : २६.१२.२०२१

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्तासह योग्य दृष्टिकोन देत आहोत


गुजरातमधील शक्तिपीठ अंबाजी मंदिराच्या हवनशाळेवरील ध्वनीक्षेपक काढण्याविषयी प्रशासनाची नोटीस

‘गुजरातमधील सर्व मशिदींवरील ध्वनीक्षेपक बंद केले जातील !’, अशी हिंदूंनी चेतावणी दिल्यानंतर नोटीस मागे !

  • ‘प्रथम मशिदींवरील ध्वनीक्षेपक बंद करून दाखवा; मग हिंदूंच्या मंदिरांवरील ध्वनीक्षेपक हिंदू स्वतःच बंद करतील’, असे प्रशासनाला सर्वच हिंदूंनी ठणकावले पाहिजे, असेच या घटनेतून लक्षात येते !
  • गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना मशिदींवरील ध्वनीक्षेपक काढण्याऐवजी शक्तिपीठ असणार्‍या मंदिराच्या हवनशाळेवरील ध्वनीक्षेपक काढण्याची नोटीस पाठवली जाणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

‘५१ शक्तिपिठांपैकी एक असणार्‍या बनासकांठा (गुजरात) येथील अंबाजी मंदिरातील हवनशाळेवर लावण्यात आलेले ध्वनीक्षेपक काढण्याचा आदेश प्रशासनाने मागे घेतला आहे. ‘ध्वनीप्रदूषण होत असल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याने ध्वनीक्षेपक काढावेत’, अशी नोटीस प्रशासनाने पाठवली होती; मात्र कच्छ संत समाजाचे अध्यक्ष योगी देवनाथ यांनी दिलेल्या चेतावणीनंतर ही नोटीस मागे घेण्यात आली आहे. योगी देवनाथ यांनी प्रशासनाने पाठवलेल्या पत्रासह ट्वीट करून म्हटले होते, ‘जर प्रशासन हा आदेश मागे घेणार नसेल, तर गुजरातमधील सर्व मशिदींवरील ध्वनीक्षेपक बंद केले जातील.’


पणजी येथील हिंदू रक्षा महाआघाडीच्या संस्था-प्रतिनिधींच्या मेळाव्यात सर्वानुमते ठराव

गोवा विधानसभा निवडणुकीत कुणाचेही सरकार आले, तरी मुख्यमंत्री हिंदूच असला पाहिजे !

‘येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाचे वा संमिश्र सरकार आले, तरी गोव्याचा मुख्यमंत्री हिंदूच असला पाहिजे. याचे कारण गोव्यात ७० टक्के हिंदू आहेत. शिवाय गोव्यातील ३४ हिंदूबहुल मतदारसंघांत उमेदवार हिंदूच असला पाहिजे’, असा ठराव हिंदू रक्षा महाआघाडीच्या संस्था-प्रतिनिधींच्या मेळाव्यात २०.१२.२०२१ या दिवशी सर्वानुमते ॐ च्या गजरात दोन्ही हात उंचावून संमत करण्यात आला. गोव्यातील विविध २३० संघटनांचे ३०० प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित होते.’


(म्हणे) ‘गांधी जयंतीच्या दिवशी ‘गोडसे झिंदाबाद’ म्हणणार्‍याला फाशी दिली पाहिजे !’ – भाजपचे खासदार वरुण गांधी

  • भारताच्या फाळणीला, तसेच राष्ट्राविषयीच्या आणि हिंदूंविषयीच्या अन्य अनेक घोडचुकांना उत्तरदायी असणार्‍या म. गांधी यांच्याविषयी लोकांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे !
  • भारताच्या फाळणीला आणि त्यानंतर झालेल्या १० लाख हिंदूंच्या हत्यांना उत्तरदायी असणार्‍यांना कोणतीही शिक्षा झाली नाही, याविषयी वरुण गांधी यांनी बोलले पाहिजे !
  • गांधी आणि नेहरू कुटुंबियांनी देशाची जी काही अधोगती केली आहे, त्याविषयी वरुण गांधी यांनी बोलले पाहिजे !
  • देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ यांसारख्या अश्लाघ्य शब्दांत हिणवले जाते. क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवून स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाला मातीमोल केले जाते. अशी टीका करणार्‍यांना फाशी द्यावी कि नाही, यावर वरुण गांधी का बोलत नाहीत ?

‘म. गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी ‘गोडसे झिंदाबाद’ म्हणणार्‍या लोकांना फाशी दिली पाहिजे. भगवान श्रीराम मर्यादापुरुषोत्तम होते. ज्यांनी लोकांना जोडण्याचे काम केले, त्या गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी ‘गोडसे झिंदाबाद’ हा ट्रेंड (ट्विटरवर चर्चा घडवून आणणे) चालवला जातो, अशी टीका भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केली. ते त्यांच्या पिलिभीत (उत्तरप्रदेश) मतदारसंघात अंगणवाडी सेविका आणि अन्य महिला कर्मचारी यांच्याशी संवाद साधत होते.’


राज्य सरकार शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवू शकते ! – केंद्र सरकार

एकीकडे अनेक जगप्रसिद्ध वैज्ञानिक त्यांच्या शोधकार्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेला आधार मानतात, तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बहुसंख्य हिंदूंच्या देशामध्ये हिंदु विद्यार्थ्यांना ती शिकवली जात नाही, हे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना अन् हिंदूंना लज्जास्पद ! हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला श्रीमद्भगवद्गीता आणि साधना शिकवली जाईल !

‘राज्यघटनेनुसार ‘शिक्षण’ हा राज्य सरकारांचा विषय आहे. जर राज्य सरकारला वाटते की, श्रीमद्भगवद्गीता शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली जावी, तर सरकार तसे करू शकते’, असे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णादेवी यांनी संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.’