विदिशा (मध्यप्रदेश) येथे हिंदु विद्यार्थिनींचे धर्मांतर केले जात असल्याच्या आरोपावरून कॅथॉलिक शाळेवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून दगडफेक

  • ४ जण पोलिसांच्या कह्यात

  • धर्मांतराचा आरोप शाळेने फेटाळला

मध्यप्रदेशमधील भाजप सरकारने या प्रकरणी चौकशी करून सत्य हिंदूंसमोर आणले पाहिजे, अशी हिंदूंची मागणी आहे ! – संपादक

विदिशा (मध्यप्रदेश) – येथील गंज बसोडामधील ‘सेंट जोसेफ’ या कॅथॉलिक शाळेत हिंदु विद्यार्थिनींचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप करत बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी शाळेवर दगडफेक करत तोडफोड केली. या दगडफेकीच्या प्रकरणी ४ जणांना कह्यात घेण्यात आले असून उर्वरितांचा शोध घेण्यात येत आहे. ही शाळा ११ वर्षांपूर्वी चालू झाली होती. भोपाळच्या ‘मलबार मिशनरी सोसायटी’कडून ही शाळा चालवली जाते. १ सहस्र ५०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून त्यांपैकी बहुतांश जण हिंदू आहेत.

१. ६ डिसेंबरला दुपारी अनुमाने ३०० लोक या शाळेच्या बाहेर जमा झाले आणि आंदोलन करू लागले. या वेळी शाळेत १२वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू होती. काही काळातच हा जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी शाळेवर दगडफेक केली.

२. शाळेचे मुख्याध्यापक ब्रदर अँथनी टायन्युमकल यांनी सांगितले की, या जमावाकडे लोखंडी सळ्या आणि दगड होते. शाळेवर दगडफेक करतांना हा जमाव ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होता. आम्ही पोलिसांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती; मात्र त्यांनी आम्हाला निश्‍चिती दिली की, हा जमाव केवळ थोडी घोषणाबाजी करील आणि नंतर शांततेत निघून जाईल; मात्र सगळा जमाव तोडफोड करून निघून गेल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोचले.

३. ब्रदर अँथनी यांचे हे आरोप फेटाळत गंज बसोडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भरत भूषण म्हणाले की, हे शांततापूर्ण आंदोलन होते; पण काही समाजकंटकांनी या संधीचा अपलाभ उठवत शाळेवर दगडफेक केली. त्यामुळे शाळेच्या इमारतीच्या काही काचा फुटल्या. शाळेला पोलीस संरक्षण देण्यात आले असून आरोपींवर कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. बजरंग दलाच्या ४ जणांना कह्यात घेण्यात आले आहे.

शाळेतील ८ हिंदु मुलींचे धर्मांतर !

विश्‍व हिंदु परिषदेचे नेते नीलेश अग्रवाल यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. ते म्हणाले की, माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरला या शाळेतील ८ हिंदु मुलींचे धर्मांतर करण्यात आले होते. बालहक्क संरक्षणासाठीच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष पिर्यांक कनुगो यांनी याविषयी विदिशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांना पत्रही लिहिले होते.
अग्रवाल यांचे हे आरोप शाळेचे मुख्याध्यापक ब्रदर अँथनी, तसेच पोलीस अधिकारी भूषण यांनी फेटाळून लावले असून ही माहिती खोटी असल्याचे सांगितले.