गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवासी यांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका ! – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – एस्.टी. कर्मचार्‍यांनो, तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाही. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा, यासाठी राज्यशासन मनापासून प्रयत्न करत आहे. माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवासी यांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, उच्च न्यायालयासमोर शासन तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी काय पावले उचलत आहे, ते सांगितले आहे. न्यायालयाचेही समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही चालू केले आहे. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढत आहोत. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा.