(म्हणे) ‘दारू, तंबाखू, गुटखा यांप्रमाणे कर भरून अमली पदार्थ सेवन करण्याची अनुमती द्या !’ – काँग्रेसचे खासदार के.टी.एस्. तुलसी यांची मागणी

जे समाजाच्या आणि प्रत्येक नागरिकाच्या हिताचे नाही, ती प्रत्येक गोष्ट बंद करणेच आवश्यक आहे. दारू, तंबाखू, गुटखा यांच्या सेवनावरही बंदी घालणे आवश्यक आहे. – संपादक

नवी देहली – अमली पदार्थ हे प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग आहे आणि अनेक प्रसंगी अमली पदार्थ आयुष्यातील वेदना न्यून करतात. दारू, तंबाखू, गुटखा आदींमुळेही हानी होते; तरीही हे अमली पदार्थ कर भरून सेवन करू दिले जातात; मग अन्य अमली पदार्थांना अनुमती का नाही ? अनेक प्रसंगी औषधांच्या माध्यमांतून अमली पदार्थ घ्यावे लागतात. असे असतांना आवश्यकता असल्यास अमली पदार्थांच्या वापरास मान्यता का दिली जाऊ नये ?, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार के.टी.एस्. तुलसी यांनी केली आहे. अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थांच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यावर तुलसी बोलत होते.

तुलसी म्हणाले की, ‘नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टंस अ‍ॅक्ट, १९८५’ (अमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ कायदा, १९८५) कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे; कारण त्याचा वापर लोकांना त्रास देण्यासाठी केला जातो.

अमली पदार्थ विरोधी कायदा काय आहे ?

‘नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टंस अ‍ॅक्ट, १९८५’ या कायद्यानुसार कोणाही व्यक्तीवर अमली पदार्थांचे उत्पादन अथवा शेती करणे, खरेदी, विक्री, स्वत:समवेत बाळगणे, वाहतूक, सेवन आदी कृतींवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. या कृती करतांना कोणी सापडल्यास या कायद्यान्वये त्याच्यावर कठोर शिक्षेची तरतूद आहे.