हिंदूंनो, आतंकवाद्यांचा प्रतिकार करण्याची सिद्धता करा !

विजयादशमीनिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘विजयादशमी हा हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या विजयाचा इतिहास सांगणारा दिवस आहे. अनेक शतके पराभूत असलेल्या हिंदु समाजाच्या घरांमध्ये सध्या विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन, अपराजितापूजन आणि सीमोल्लंघन या कृती केवळ औपचारिकता म्हणून केल्या जातात. आज शस्त्रपूजन केवळ शेतकी आणि घरगुती उपकरणांच्या पूजनापुरते मर्यादित झाले आहे. धर्मशिक्षणाच्या अभावी अपराजितादेवीचे पूजन लुप्त झाले आहे आणि पूर्वीचे युद्धासाठीचे सीमोल्लंघन आता केवळ नगराच्या वेशीबाहेरील मंदिरात जाऊन दर्शन घेण्यापुरते सीमित झाले आहे.

सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांचे राज्य स्थापित झाले आहे. या अफगाणिस्तानपासून आता देहली दूर नाही. त्यामुळे काश्मीरपासून केरळपर्यंत ‘स्लीपर सेल्स’ (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांधांचे स्थानिक गट) मध्ये सक्रीय असलेले आतंकवादी भारतात ‘तालिबानी राज्य’ आणण्यासाठी उत्सुक आहेत. काश्मीरमधील जिहादी संघटनांनी तालिबानचे साहाय्य मागणे, काश्मिरी नेत्यांनी तालिबानचे समर्थन करणे, पंजाब-उत्तरप्रदेशमध्ये आतंकवादी पकडले जाणे इत्यादी त्याची दृश्य उदाहरणे आहेत. ते भारतात कधीही युद्ध पुकारू शकतात. अशा स्थितीत न्यूनतम स्वतःचे, परिवाराचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी तरी सशस्त्र आतंकवाद्यांचा प्रतिकार करण्याची सिद्धता करा !

लक्षात ठेवा, शस्त्रपूजनाद्वारे उपकरणांमध्ये शक्तीची प्रतिष्ठापना होते. अपराजितादेवीचे पूजन म्हणजे पराजय टाळणे आणि विजयप्राप्ती यांसाठी केलेली शक्तीची आराधना होय. सीमोल्लंघन म्हणजे प्रत्यक्ष विजयासाठी शत्रूच्या सीमेत प्रवेश करणे होय. विजयादशमीच्या कर्मकांडांचा हा अर्थ जाणून काळानुसार प्रत्येक कृती करा ! वैधानिक परवाने असलेल्या शस्त्रांचे पूजन करा ! हिंदूंच्या विजयासाठी अपराजितादेवीचे भावपूर्ण पूजन करा ! यावर्षी विजयादशमीचे खरे सीमोल्लंघन करण्याचा आरंभ म्हणून आपल्या क्षेत्रातील संशयास्पद आतंकवादी हालचालींची माहिती पोलीस-प्रशासनास द्या ! हिंदूंनो, एवढ्या कृती जरी निश्चयपूर्वक केल्या, तरी विजयादशमी साजरी केल्याचा खरा आनंद मिळेल !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था.