ठाकुर्ली (डोंबिवली) येथे रिक्शातील प्रवाशांवर चोरट्यांचे आक्रमण !

१ ठार, तर १ जण घायाळ

असुरक्षित डोंबिवली शहर ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – ठाकुर्ली परिसरात रिक्शामधून कल्याणच्या दिशेने जाणार्‍या २ प्रवाशांवर चोरट्यांनी आक्रमण केले. चोरट्यांनी गळा कापल्यामुळे यापैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीररीत्या घायाळ झाला आहे. वाचलेल्या प्रवाशाने दिलेल्या माहितीच्या आधारे रेल्वे पोलीस आणि टिळकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस या घटनेचे पुढील अन्वेषण करत आहेत. ही घटना लुटीच्या उद्देशाने झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून या घटनेमुळे कल्याण आणि डोंबिवली परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

कल्याण आणि डोंबिवली या २ शहरांना जोडणारा ९० फुटी रस्ता हा गुन्हेगारांचा अड्डा होत चालला असून तेथे रात्रीच्या वेळीस गर्दुल्ल्यांचा वावर असतो. डोंबिवली येथील शेलारनाका परिसरात रहाणारे बेचनप्रसाद चौहान आणि बबलू चौहान हे दोघे उत्तरप्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील त्यांच्या गावी जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात जात होते. रात्रीच्या वेळी त्यांची रिक्शा खंबाळपाडा परिसरात पोचताच चोरट्यांनी त्यांना अडवून त्यांच्यावर आक्रमण केले.