अतिक्रमणमुक्तीची आशा !

संपादकीय

आसाममधील चहाचे मळे धर्मांधांनी कह्यात घेणे, हा काँग्रेसच्या निष्क्रीयतेचा परिणाम ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

देशात वैध बांधकामे झाली किंवा वैध मार्गाने एखादी योजना कार्यान्वित केली गेली, अशा प्रकारच्या घटना सध्या पुष्कळ अल्प किंवा दुर्मिळच आढळतात; कारण सर्वत्र अवैधतेचाच सुळसुळाट झाला आहे. अवैधतेचे एक अंग म्हणजे ‘अतिक्रमण’ असे म्हणता येईल. आजवर देशात अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवणे पोलीस आणि प्रशासन यांना कठीण होत आहे. अतिक्रमण कुठले आणि वैध मार्गाने केलेले बांधकाम कुठले, यांचा थांगपत्ताच लागत नाही. अशा प्रकारांमुळे ‘वैध’ हा शब्दच मागे पडत चालला आहे आणि ‘अवैध तेच खरे’ असे होत आहे. यातूनच अतिक्रमण करणार्‍यांचे फावते आणि शेवटी ते डोक्यावर बसतात. आसाममध्ये एका अतिक्रमण हटाव मोहिमेच्या काळात याचा पुन्हा प्रत्यय आला. येथे एका भागातील शेती प्रकल्पाच्या भूमीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस कारवाई करत होते; पण तेथे उपस्थित असलेल्यांनी त्या मोहिमेला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केला. शेवटी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या विरोधाचे रूपांतर हिंसेत होऊन २ आंदोलकांचा मृत्यू झाला, तर ९ पोलीस कर्मचारी आणि अन्य घायाळ झाले. जेव्हा पोलीस तेथे पोचले, तेव्हा तेथे सहस्रो नागरिक घोषणा देत होते. पोलीस येईपर्यंत इतक्या मोठ्या संख्येत जमाव एकत्र येतो, यावरूनच हा जमाव म्हणजे नेमके कोण असेल, ते लक्षात येते. या गावात बंगालमधून आलेल्या धर्मांधांची संख्या अधिक आहे. त्यांनीच येथील भूमीवर अतिक्रमण करून तिचे नियंत्रण मिळवले आहे. आसाम मंत्रीमंडळाने यापूर्वी अतिक्रमण झालेली भूमी वसूल करून तिचे राज्य कृषी प्रकल्पात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने ही मोहीम हाती घेण्यात आली. मोहिमेनंतर ८०० लोकांचा निवारा (अतिक्रमण) हटवण्यात आला. बांगलादेशी मुसलमानांनी आसाम येथील मंदिरे आणि वैष्णवी मठ अशा हिंदूंची धार्मिक स्थळे असलेल्या भूमीवर बर्‍याच कालावधीपासून अतिक्रमण केले होते. त्यामुळे जून २०२१ मध्येही तेथे अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली. या वेळी मुसलमानांनी कह्यात घेतलेली बरीच मोठी भूमी असलेले प्राचीन शिवमंदिरही अतिक्रमणमुक्त करण्यात आले. धर्मांध या मंदिरावर स्वतःचे नियंत्रण दाखवत होते. मोगलांनी हिंदूंची अगणित मंदिरे तोडली, काही उद्ध्वस्त केली, हे हिंदूंनी विसरता कामा नये; कारण आज त्याच मोगलांचे वंशज असणारी आजची इस्लामी पिढी हिंदूंची उरलीसुरली मंदिरे आणि मठ यांवर नियंत्रण आणून धर्मर्‍हास घडवत आहेत. तेथील भूमीतून मिळणार्‍या संपत्तीवरच त्यांचा डोळा आहे.

अतिक्रमणांना काँग्रेस उत्तरदायी !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी धार्मिक संस्था आणि सरकारी भूमी यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आतापर्यंत अशी शेकडो अतिक्रमणे हटवली आहेत आणि अजूनही उर्वरित भूमी अतिक्रमणमुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे. काँग्रेसच्या कार्यकाळातही अतिक्रमणे हटवण्याची मोहीम राबवली जायची; पण ती पूर्णत्वास न नेता अर्धवटच सोडून देण्यात येत असे. अर्धवट मोहिमेमुळे धर्मांध पुन्हा मंदिरे किंवा मठ यांच्यावर नियंत्रण मिळवायचे. शेवटी काय, तर ‘ये रे माझ्या मागल्या’, असाच प्रकार होत असे. मोहीम अर्धवट ठेवण्यामागे त्यातून स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काँग्रेसचे षड्यंत्र होते, हे वेगळे सांगायला नको. या वेळी भाजप सरकारने मात्र पुन्हा अतिक्रमण केल्यास विविध कायदे, नियम यांनुसार अटक करण्याची चेतावणी धर्मांधांना दिली आहे. आसाममधील एका गावात १२ वर्षांपूर्वी बांगलादेशी घुसखोरांनी शिरकाव करून तेथील रबराची झाडे कापली आणि हळदीची शेती चालू केली. त्यांची साधारणतः १५ कुटुंबे होती. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अंतर्गत त्यांची घरे आणि हळदीची शेती हे सर्वच नष्ट करण्यात आले. अशा कठोर भूमिकेमुळे अतिक्रमणकर्त्यांवर आपसूकच वचक राहील आणि अतिक्रमणे केली जाणार नाहीत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आसाममध्ये घडलेल्या हिंसाचाराला विरोध करत अतिक्रमणकर्त्यांचे जणू समर्थनच केले आहे; पण ‘ही सर्व अतिक्रमणे काँग्रेसच्याच कार्यकाळात झाली आहेत’, हे राहुल गांधी बहुदा विसरले असावेत. आसाम हे राज्य चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे चहाचे मळेही बांगलादेशी घुसखोरांनी स्वतःच्या कह्यात घेतले आहेत. या सत्यतेविषयी राहुल गांधी चकार शब्द काढत नाहीत, हे काँग्रेसप्रेमींनी लक्षात घ्यायला हवे. ‘भूमीचा एक तुकडा असो, चहाचा मळा असो किंवा हिंदूंचे मंदिर आणि मठ असोत, प्रत्येकावर केवळ आणि केवळ भारतियांचाच हक्क आहे’, हे धर्मांधांनी जाणावे.

प्रतिकात्मक छायाचित्र

एकेक इंच भूमीसुद्धा भारतियांचीच आहे. त्यामुळे ती भारतियांच्याच कह्यात असायला हवी. ‘ज्याप्रमाणे काश्मीरमधील भूमीचे लचके तोडून तिला भारतापासून विलग करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तोच काहीसा प्रकार आसाममध्ये या अतिक्रमणांच्या माध्यमातून चालू आहे’, असे म्हणता येईल. थोडक्यात काय, तर प्रत्येक ठिकाणचीच परिस्थिती सुधारणे क्रमप्राप्त आहे. जे आज आसाममध्ये घडत आहे, ते बंगालमध्येही घडतांना दिसत आहे. भविष्यात अन्य राज्यांतही अशी स्थिती उद्भवल्यास आश्चर्य वाटायला नको. आसाममध्ये जोर धरलेली अतिक्रमण हटाव मोहीम सर्वच राज्यात गतीमान झाल्यास भारत खर्‍या अर्थाने अतिक्रमणमुक्त होईल. अतिक्रमणे वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणारे धर्मांध, तसेच बांगलादेशी घुसखोर यांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा, तरच ही अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवणे सुकर होईल. ही मोहीम राबवणे धारिष्ट्याचे आहे, तिला विरोधही मोठ्या प्रमाणात होईल; मात्र भारत अतिक्रमणमुक्त होण्यासाठी पोलीस, प्रशासन आणि सरकार यांच्या कार्यतत्पर भूमिकेचे योगदान महत्त्वाचे ठरेल, हेही तितकेच खरे !