हिंदूंना धर्मज्ञान देण्याचे सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य ! – श्री श्री विदुशेखर भारती महास्वामीजी, उत्तराधिकारी, श्रृंगेरी श्री शारदा पीठ

श्री श्री विदुशेखर भारती महास्वामीजी

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदूंना धर्मज्ञान देण्याचे सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य आहे. सनातनचे हे धर्मकार्य पुष्कळ चांगले आहे आणि ‘सनातन धर्माच्या ज्ञानशक्ती प्रसार मोहिमे’मध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, असा आशीर्वाद श्रृंगेरी श्री शारदा पिठाचे उत्तराधिकारी श्री श्री विदुशेखर भारती महास्वामीजी यांनी सनातनच्या साधकांना दिला. ‘सनातन धर्माच्या ज्ञानशक्ती प्रसार मोहिमे’च्या निमित्ताने साधकांनी श्री श्री विदुशेखर भारती महास्वामीजी यांची भेट घेतली. स्वामीजींना सनातनचे ग्रंथ दाखवले तेव्हा त्यांनी उत्सुकतेने प्रत्येक ग्रंथ, तसेच सनातन पंचांगाची सर्व पृष्ठे पाहिली. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याविषयीही त्यांनी जाणून घेतले. कर्नाटक राज्यात १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ‘सनातन ज्ञानशक्ती प्रसार मोहीम’ या नावाने एक अभियान चालू असून या माध्यमातून सनातनच्या चैतन्यमय ग्रंथांचा व्यापक प्रसार करण्यात येत आहे. सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानशक्ती घरोघरी पोचवण्याचा या मोहिमेचा व्यापक उद्देश असून यात सनातनचे साधक, धर्मप्रेमी आणि हितचिंतक सहभागी झाले आहेत.

सनातनचे कार्य पुष्कळ चांगले चालू आहे ! – श्री श्री श्री सद्गुरु ब्रह्मानंद सरस्वती महाराज, श्रीराम क्षेत्र महासंस्थान, कन्याडी, दक्षिण कन्नड

सनातन संस्था समाजात अध्यात्म आणि नैतिक मूल्ये यांच्याविषयी जागृती करण्याचे धर्मकार्य करत आहे. हिंदूंना धर्मज्ञान मिळावे, यासाठी सनातनने अनेक धार्मिक विचारांचे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. सनातनचे हे कार्य अत्यंत स्तुत्य आहे. आम्ही अनेक वर्षांपासून सनातनच्या संपर्कात आहोत. सनातनचे कार्य पुष्कळ चांगले चालू आहे, असे गौरवोद्गार दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कन्याडी येथील श्री श्री श्री सद्गुरु ब्रह्मानंद सरस्वती महाराज यांनी सनातन संस्थेच्या कार्याविषयी काढले. सनातनच्या साधकांनी अलीकडेच त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

श्री श्री श्री सद्गुरु ब्रह्मानंद सरस्वती महाराज पुढे म्हणाले, ‘‘आताच्या मेकॉले शिक्षण पद्धतीमुळे आजची पिढी हिंदु धर्माच्या आचार-विचारांपासून लांब गेली आहे आणि धर्माच्या ज्ञानापासून वंचित आहे. प्राचीन काळी भारतात गुरुकुल शिक्षणव्यवस्था होती. त्यामुळे मनुष्याला सर्वांगीण विकासासाठी योग्य शिक्षण मिळत असे. मेकॉले शिक्षण पद्धतीमुळे भारतीय नागरिक केवळ शिक्षणाची पदवी आणि आर्थिक विकास एवढ्यांपुरताच मर्यादित राहिला. या पार्श्वभूमीवर कहिंदूंना धर्मज्ञान मिळण्यासाठी सनातनने जे धार्मिक ग्रंथ प्रकाशित केले आहेत, ते कौतुकास्पद आहेत.’’

सनातनचे सर्व ग्रंथ उत्तम असून राज्यातील सर्व मंदिरांमध्ये ठेवणे आवश्यक ! – महर्षि डॉ. आनंद गुरुजी, अध्यक्ष, कर्नाटक राज्य धार्मिक परिषद

प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या कुटुंबियांना, कुटुंबातील व्यक्तींना आणि मुलांना धर्मशिक्षण द्यावे. आधुनिक जीवनात सर्व लोक मायेत गुरफटल्याने त्यांना ज्ञान देण्यासाठी सनातनने अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. हे ग्रंथ सर्वांच्या घरी असायला हवे. सनातनने या ग्रंथांतून हिंदु धर्मातील बारकाव्यांची चांगली माहिती दिली आहे. सनातनचे सर्व ग्रंथ उत्तम असून राज्यातील सर्व मंदिरांमध्ये ते ठेवणे आवश्यक आहे, असे गौरवोद्गार कर्नाटक राज्य धार्मिक परिषदेचे अध्यक्ष महर्षि डॉ. आनंद गुरुजी यांनी काढले. १३ सप्टेंबर या दिवशी सनातनच्या साधकांनी ‘सनातन ज्ञानशक्ती प्रसार मोहिमे’साठी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्या वेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले.