क्रूर मोगलांचे उदात्तीकरण करणारे चित्रपट आणि त्यांचे प्रायोजक यांवर हिंदूंनी बहिष्कार घालायला हवा ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

‘दी एम्पायर : क्रूर इस्लामी आक्रमकांचे गुणगान’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

अधिवक्ता सुभाष झा

पुणे – आज बॉलीवूडवाले अल्पसंख्यांकांच्या श्रद्धास्थानांवर आघात करणारे चित्रपट काढण्यास घाबरतात; कारण त्यांना त्यांचा जीव जाईल किंवा मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागेल, याची भीती वाटत असते. हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात केल्यावर हिंदु समाजही आपल्याला आर्थिक वा सामाजिक हानी मोठ्या प्रमाणावर पोचवू शकतो, याची जाणीव बॉलीवूडवाल्यांना झाली की, ते हिंदूंच्या विरोधात चित्रपट काढण्याचे धाडस करणार नाहीत. यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन असे चित्रपट आणि चित्रपटांचे सर्व प्रायोजक यांच्या वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा. तसेच त्यांना वैध मार्गाने तीव्र विरोध करायला हवा. तसे झाले, तरच बॉलीवूडवाले त्याची (हिंदूंच्या विरोधाची) नक्कीच नोंद घेतील. यासाठी हिंदूंनी अन्य हिंदूंचे प्रबोधन करून त्यांना शिक्षित केले पाहिजे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता सुभाष झा यांनी केले. नुकतीच ‘दी एम्पायर’ या नावाची वेब सिरीज प्रदर्शित झाली असून त्यामध्ये मोगल आणि बाबर यांचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. या वेब सिरीजच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘दी एम्पायर : क्रूर इस्लामी आक्रमकांचे गुणगान’ या विषयावर २९ ऑगस्ट २०२१ या दिवशी ‘ऑनलाईन’ विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

या विशेष संवादामध्ये हरियाणा येथील विवेकानंद कार्य समितीचे कार्याध्यक्ष श्री. नीरज अत्री हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया अन् सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनीही सहभाग घेतला.  या विशेष संवादाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. या कार्यक्रमाचे थेट ५ सहस्र १०० हून अधिक हिंदूंनी पाहिले.


धर्मांधांच्या असत्य प्रचाराला त्याच भाषेत अभ्यासपूर्ण उत्तर दिल्यास ते खोटे बोलण्याचे धाडस करणार नाहीत ! – नीरज अत्री, कार्याध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती

श्री. नीरज अत्री

१. राममंदिराचे बांधकाम चालू असतांना बाबरचे उदात्तीकरण करणारी ‘दी एम्पायर’ नावाची वेब सिरीज येते. यात योगायोग नसून ठरवून हे श्रीराम मंदिर आणि हिंदुत्व यांच्याविरोधात केलेले षड्यंत्र आहे. पूर्वी ते लोक तलवारीच्या बळावर बाटवाबाटवी करायचे. आता मनावर सर्वाधिक प्रभाव टाकणार्‍या ‘वेब सिरीज’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शस्त्र म्हणून उपयोग करत आहेत. आपणही अशा असत्य प्रचाराला त्याच भाषेत अभ्यासपूर्ण उत्तर दिले पाहिजे. असे झाले तरच ‘कबीर खान’सारखे धर्मांध दिग्दर्शक ‘मोगल राष्ट्रनिर्माते होते’, असे उघडपणे खोटे बोलण्याचे धाडस करणार नाहीत.

२. याचसमवेत केंद्रीय शिक्षण संस्था, सेन्सॉर बोर्ड आणि अनेक ठिकाणी साम्यवादी अन् जिहादी मानसिकतेचे लोक बसलेले आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे ‘राजकारणाचे हिंदुकरण केले पाहिजे’. त्यातून सत्य इतिहास लोकांसमोर येईल.


बॉलीवूडच्या माध्यमातून हिंदु धर्मविरोधी मानसिकता जोपासली जाते ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. आनंद जाखोटिया

कुख्यात करीम लाला, दाऊद आदी ५ प्रमुख गुन्हेगारी टोळ्यांमध्ये मुसलमान सर्वाधिक असतांना त्यावर चित्रपट काढतांना ‘डॉन’ची (कुख्यात गुंडाची) भूमिका ही नेहमी हिंदूंना दिली जात होती. यातून ‘गुन्हेगार कोण तर हिंदू’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता. डॉनची भूमिका करणारे अमिताभ बच्चन यांचे चित्रपटातील नाव ‘विजय’ असून, तो देवळात जात नाही, असे दाखवण्यात आले आहे; मात्र त्याला ‘७८६’चा (मुसलमानांचा पवित्र आकडा) बिल्ला वाचवतो, असे दाखवले होते. तीच मानसिकता आजही बॉलीवूडमध्ये आहे.


‘दी एम्पायर’ वेब सिरीजच्या माध्यमातून भारतातील तालिबानी समर्थकांमध्ये उत्साह भरण्याचे काम चालू ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

‘मुगल-ए-आजम’ या चित्रपटापासून ते ‘दी एम्पायर’ या वेब सिरीजपर्यंत इस्लामी आक्रमकांचे गुणगान करून त्यांचे उदात्तीकरण केले गेले आहे. मोगलांविषयी कळवळा असणारे पूर्वीही होते आणि आजही ते जिवंत आहेत. राममंदिरासह अनेक हिंदु मंदिरे तोडणारा बाबर हा तैमूरचा वंशज होता. आज अभिनेता सैफ अली खान तैमूरचे नाव स्वत:च्या मुलाला देतो. यातून त्याची मानसिकता लक्षात येते. तालिबानचे पुढे भारतावर आक्रमण होऊ शकते. अशा वेळी ‘दी एम्पायर’ वेब सिरीजद्वारे बाबराला पुन्हा जिवंत करून भारतातील तालिबानी समर्थकांमध्ये उत्साह भरण्याचे काम चालू आहे.