मंदिरे धर्मजागृतीचा संदेश देणारी केंद्रे व्हावीत ! – राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन

‘देवस्थान भूमी संरक्षण परिषद’

व्यासपिठावर उपस्थित आमदार संग्राम जगताप आणि अन्य मंदिरांचे विश्वस्त, तसेच मंदिर महासंघाचे पदाधिकारी

अहिल्यानगर – मंदिरे ही हिंदु धर्माची प्रमुख केंद्रस्थाने असून गावोगावी हिंदूंनी संघटित होऊन मंदिरांमधून धर्मजागृतीचा संदेश देणारी यंत्रणा उभारली पाहिजे. काही गावांत बंद झालेल्या मूळच्या यात्रा पुन्हा चालू कराव्यात, तसेच दर्ग्यामध्ये रूपांतरित झालेली हिंदूंची देवस्थाने पुन्हा मिळवण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री. संग्राम जगताप यांनी केले. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ८ जून या दिवशी अहिल्यानगर येथील पटेलवाडी मंगल कार्यालयात आयोजित ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदे’त ते बोलत होते.

या वेळी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘सर्व मंदिरे भक्तांकडे सोपवली जावीत आणि राष्ट्रीय पातळीवर ‘सनातन बोर्ड’ची स्थापना व्हावी. मंदिरांशी संबंधित व्यवसाय मढी देवस्थानाच्या धर्तीवर श्रद्धावान हिंदूंच्याच माध्यमातून चालवले पाहिजेत. ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’ या कायद्याला सरकारने स्थगिती दिली असली, तरी हा कायदा पुढे लागू होऊ नये, यासाठी मंदिर विश्वस्त आणि पुरोहित यांनी संघटित रहाण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ लागू करण्याची मागणी

हिंदु मंदिरांच्या भूमीवर होणारी परकीय धार्मिक अतिक्रमणे आणि वक्फ बोर्डाकडून बळकावल्या जाणार्‍या भूमी रोखण्यासाठी शासनाने आगामी अधिवेशनात कठोर ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ (भूमी हडप प्रतिबंधक कायदा) लागू करावा, अशी मागणी या परिषदेत करण्यात आली.

उपस्थित मान्यवर

या परिषदेला मढी देवस्थानचे कार्याध्यक्ष महादेव कोकाटे, ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर, भाजपचे कार्यालयीन मंत्री मुकुल गंधे, मंदिर महासंघाचे भरत शिंदे, अधिवक्ता नामदेव जायभाये यांच्यासह अनेक विश्वस्त, पुरोहित आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.