हिंदूंचा नक्षलवादातील सहभाग आणि त्यांचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी धर्माभिमान वाढवून संघटित होणे आवश्यक ! – मिनेश पुजारे, हिंदु जनजागृती समिती

सांगली येथे ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन

श्री. मिनेश पुजारे

सांगली – वर्ष १८५७ च्या उठावानंतर हिंदूंना शौर्यहीन बनवण्याचे मोठे षड्यंत्र चालू झाले. या षड्यंत्राच्या माध्यमातून हिंदूंच्या मनातून शौर्य नाहीसे करण्यात आले. आज हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याने प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घेऊन सक्षम होणे आवश्यक आहे. क्रांतीकारकांनी तरुण वयात देश आणि धर्म यांसाठी आपल्या जीवनाचा त्याग केला. तोच आदर्श घेऊन सध्याच्या युवा पिढीने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती वर्गात सहभागी व्हावे. आपल्या देशावरील सर्वांत मोठे संकट म्हणजे हिंदूंचे मतपरिवर्तन करून त्यांना नक्षलवादी चळवळीत सहभागी करून घेणे, तसेच हिंदूंचे धर्मांतर करून त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी वापर करणे. हे थांबवण्यासाठी हिंदूंनी धर्माभिमान वाढवून संघटित होणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे यांनी केले. सांगली येथील युवक आणि युवती यांच्यासाठी नुकतेच ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या व्याख्यानाला युवक आणि युवती यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. स्नेहल पारे यांनी केले, तर श्री. ज्ञानदीप चोरमले यांनी उद्देश सांगितला.

अभिप्राय

कु. यशस्वी जोशी, सांगली – आपल्या देशात घडणार्‍या घटनांविषयी माहिती नव्हते. या घटना ऐकून वाईट वाटले; मात्र आता हे व्याख्यान ऐकून शौर्यजागृती करण्याची आवश्यकता लक्षात आली.