गुरुचरणी कृतज्ञता पुष्प !

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वतीने काढण्यात आलेल्या मागील २ विशेषांकांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सप्तर्षींनी मानवजातीसाठी उलगडलेले अवतारत्व आपण जाणून घेतले. परात्पर गुरु डॉ. आठवले हे भूतलावर मानवजातीच्या उद्धारासाठी कार्यरत असणारे एकमेवाद्वितीयच आहेत ! गेले काही दिवस ठिकठिकाणी झालेली अतीवृष्टी आणि त्यामुळे आलेला महापूर अन् सर्वत्र उडालेला हाहा:कार ही आपत्काळाची लक्षणे आपण पहातच आहोत. पुढील आपत्काळ याहूनही भीषण असणार आहे. अशा वेळी ‘आपत्काळापासून वाचण्यासाठी साधनाच उपयोगी पडणार आहे’, असे मार्गदर्शन करून त्याविषयीची पूर्वसिद्धता परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध माध्यमांतून सांगितली आहे. त्यांनी निर्मिलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना करून केवळ साधकांचीच नव्हे, तर समाजातील व्यक्तींचीही आध्यात्मिक उन्नती होत आहे.

आजच्या या विशेषांकात प्रसिद्ध झालेल्या लिखाणात ‘रामनाथी येथील आश्रमात झालेले विविध दैवी पालट’, ‘आपत्काळातील हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना !’ आदी विविध विषयांना स्पर्श केला आहे. यातून परात्पर गुरुदेवांची महानता आपल्या लक्षात येते. अशा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्याची संधी मिळणे, हे साधकांचे भाग्य ! त्या कृतज्ञताभावात साधकांना सतत रहाता यावे, हाच या विशेषांकाचा उद्देश होय !