संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत !

विदर्भात मुसळधार पावसात चौघे जण वाहून गेले

  • अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत !

  • रुग्णालयातील अतीदक्षता विभाग जलमय

नागपूर – नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्याला अतीवृष्टीचा फटका बसला. चंद्रभागा नदीला पूर आल्याने धापेवाड्यातील विठ्ठल मंदिराच्या पायथ्यापर्यंत पाणी आले. कळमेश्वर तालुक्यात खडकनाल्याला पूर आल्याने वाहतूक खोळंबली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीला आलेल्या पुरात रंभाबाई मेश्राम (वय ७० वर्षे) ही महिला वाहून गेली, तर तास येथील संतोष शंभरकर हे बैलजोडीसह वाहून गेले. पुरामुळे २० गावांचा संपर्क तुटला आहे.

अमरावती – जिल्ह्यात काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सिपना नदीही धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे.

यवतमाळ – जिल्ह्यातील पैनगंगा अभयारण्यालगतच्या गावांचा संपर्क तुटला होता; मात्र काही कालावधीनंतर तो पूर्ववत् झाला. एक तरुण पुरात वाहून गेला; पण आश्चर्यकारकरित्या तो वाचला. अतीवृष्टीमुळे येथील ४० घरांची पडझड झाली.

चंद्रपूर – पावसाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा गावाला बसला आहे. येथील एक शेतकरी वाहून गेला, तर राजुरा-गडचांदूर आणि राजुरा-गोवरी हे मार्ग बंद झाले. राजुरा येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून शहरातही अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. चंद्रपूर शहरातही रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. शहरातील जवळपास सर्वच मुख्य मार्गांवर पाणी साचल्याने त्यातून मार्ग काढणे कठीण झाले. अनेक घरांमध्ये नाल्यांचे पाणी शिरले आहे.


अकोला जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हाहाकार !

अकोल्यातील पूरजन्य स्थिती

अकोला – जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या अतीवृष्टीमुळे ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील नदीकाठच्या भागात पुष्कळ पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. मध्यरात्रीपासूनच असंख्य नागरिकांना सुरक्षास्थळी हालवले जात आहे. शहरातील सखल भागांतील घरांत पाणी शिरले आहे. घरांमध्ये कमरेइतके पाणी साचल्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.

आमदार रणधीर सावरकर यांनी रात्रीपासूनच पुरात अडकलेल्या अनुमाने ५० जणांना तातडीने बाहेर काढून सुरक्षित स्थळी हालवले. वीज पुरवठा खंडित झाल्याने बचावकार्यात अडचणी येत होत्या. पुरातील नागरिकांना वाचवण्यासाठी नावेचा वापर करण्यात आला. रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने पूरग्रस्तांसाठी चहा, पाणी, अल्पाहार आणि भोजन यांची व्यवस्था करण्यात आली.

अकोल्यातील पूरजन्य स्थिती

पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांची अतोनात हानी झाली आहे.

सर्वोपचार रुग्णालयात पावसाचे पाणी साचल्याने रुग्णांचे हाल झाले. अतीदक्षता विभाग पूर्णत: जलमय झाला होता.


सांगली जिल्ह्याला पुन्हा महापुराचा धोका !

कृष्णा नदीची पाणी पातळी ५२ फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज

सांगली – संततधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. कृष्णा नदीचे पाणी शहरातील सखल भागात शिरले. येथील आयर्विन पुलाच्या ठिकाणी ४० फूट ही चेतावणी पातळी ओलांडली असून पाण्याची धोका पातळीकडे वाटचाल चालू आहे. संततधार पाऊस आणि कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी १० ते १२ फुटांनी वाढून ५० ते ५२ फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीला पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना अती सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

१. वाढत्या पाणी पातळीमुळे वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर-ताकरी आणि पलूस तालुक्यातील अमणापूर पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे, तर कृष्णा नदीवरील अंकलखोप, मौजे डिग्रज, म्हैसाळ येथील बंधारे आधीच पाण्याखाली गेले आहेत.

२. जुना नांद्रे-कर्नाळ रस्ता पाण्याखाली गेला असून सूर्यवंशी प्लॉट येथे पाणी शिरले आहे. २२ जुलैच्या रात्रीपासून भिलवडीच्या मौला नगरसह सांगली शहरातील पूरस्थितीतील १५० हून अधिक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. पूरपट्ट्यातील नागरिकांनी स्वतःहून स्थलांतर करण्यास प्रारंभ केला आहे.

वारणा नदीला पूर

वारणा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असून चांदोली धरणातून चालू असलेला विसर्ग आणि संततधार पाऊस यांमुळे वारणा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील जवळपास तीन पूल आणि ९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा जवळचा संपर्क तुटला आहे.


सांगलीत अनेक ठिकाणी पाणी आल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद !

सांगली, २३ जुलै (वार्ता.) – २३ जुलै या दिवशी ‘एन्.डी.आर्.एफ्’ची २ पथके सांगली जिल्ह्यात दाखल झाली आहेत. एक पथक आष्टा आणि शिरगाव (तालुका वाळवा) येथे कार्यरत असून दुसरे पथक सांगलीत दाखल झाले आहे. नागरिकांना बोटींद्वारे बाहेर काढण्याची वेळ येऊ नये, तसेच त्यांनी वेळीच सुरक्षास्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

सध्या स्थलांतरीत झालेल्या नागरिकांसाठी २ निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. जसजशी स्थलांतरीत कुटुंबांची संख्या वाढेल, त्या प्रमाणात निवारा केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. २३ जुलै या दिवशी आयर्विन पूल येथे पाणीपातळी ४२ फुटांहून अधिक असून पाणीपातळी लवकरच ५२ फुटांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यवसायिकांना आवाहन केले आहे की, पाणीपातळी ५० फुटांपर्यंत वाढल्यास बाजारपेठेत पाणी येऊ शकते. त्यामुळे ज्यांना साहित्याची हलवाहलव करायची असेल, तर त्यांनाही मुभा देण्यात आली आहे.

ईश्वरपूरनजीक ताकारी येथील बोरगाव-ताकारी पुलावर २२ जुलैच्या रात्री पाणी आल्याने तेथील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तसेच मांगले-काखे पूल (तालुका शिराळा), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर आणि अनेक ठिकाणी पाणी आल्याने एकूण ९ ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.


परभणी जिल्ह्यात ३२ तालुक्यांमध्ये अतीवृष्टी !

शेकडो हेक्टरखालील पिके पाण्याखाली !

परभणी – जिल्ह्यात पुन्हा एकदा अतीवृष्टी झाल्याने नदी-नाले यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील गोदावरी आणि दुधना या मुख्य नद्यांसह अन्य नद्याही दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या पिकांची हानी झाली आहे. येथील ३२ तालुक्यांमध्ये अतीवृष्टी झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला.

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पिकांवरही संकट ओढावले आहे. शेतातून पाण्याचा निचरा होत नसल्याने आणि जिल्ह्यातील शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने खरिपाचा हंगाम धोक्यात आला आहे. पहिल्या अतीवृष्टीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असतांना दुसर्‍यांदा अतीवृष्टी झाल्याने प्रशासनासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेच्या पाण्याने पूरस्थिती गंभीर : अनेक रस्ते बंद, अनेक उपनगरांना पाण्याचा वेढा

कोल्हापूर, २३ जुलै (वार्ता.) – पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रात्री ८ वाजता राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ५५.५ फूट नोंदवली गेली. जिल्ह्यातील एकूण ११६ बंधारे पाण्याखाली असून शहरातील अनेक उपनगरांत पाणी घुसले आहे. अनेक उपनगररांमध्ये सकाळपासून वीज गेल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. शहरातील पाणीपुरवठा करणारे पंप पाण्याखाली गेले असून उद्यापासून परिस्थिती सुधारेपर्यंत शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने कळवले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यासाठी ‘एन्.डी.आर्.एफ्.’च्या पथकासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन काम करत आहे. शहरातील अनेक छोटे नाले, ओढे यांतील पाणी पात्राबाहेर पडल्याने शहरात सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली होती.


सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन !

सातारा – कोयना धरण परिसर, पाटण, वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस पडला असून काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी अनेक पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. कोयना धरणामध्ये ५७.७ टी.एम्.सी. एवढा पाणीसाठा झाला असून कराड येथील प्रीतीसंगम घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. हे पाणी आता यशवंतराव चव्हाण उद्यानामध्ये शिरले असून कराडला पाण्याचा वेढा पडला आहे. कराड शहरातील

१५० हून अधिक कुटुंबियांचे नगरपालिकेच्या वतीने स्थलांतर करण्यात आले आहे. वाई येथील गणपति घाट पूर्णत: पाण्याखाली गेला असून श्री महागणपति मंदिरामध्ये पाणी शिरले आहे. महाबळेश्वर येथे कास-जुंगटी या मार्गावरील पूल खचल्यामुळे जुंगटी, जळकेवाडी या ठिकाणी जाणारी वाहतूक ठप्प झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

पाटण तालुक्यातील किल्ले मोरगिरीजवळील मिसाळवाडी, जोतिबाची वाडी, येराड, मीरगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. वाई तालुक्यातील कोंढवलीजवळील देवरूखवाडी येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. या ठिकाणी ४-५ घरे ढिगार्‍याखाली गेली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घेरादातेगड या गावाजवळ दरडी कोसळल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवजा रस्ता येथील कामरगाव येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. ढोकावळे गावात २ दिवसांच्या अतीवृष्टीमुळे दरडी कोसळत आहेत. काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे. मीरगाव-कामरगाव या ठिकाणी धरणग्रस्त गावावर दरड कोसळी असून १० ते १२ जण दगावले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे शहरातील मुठा नदीतील विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने नागरिकांना सतर्कतेची चेतावणी !

पुणे, २३ जुलै – खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे खडकवासला धरण २३ जुलै या दिवशी १०० टक्के भरले. या धरणातून मुठा नदीपात्रात १० सहस्र ९६ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मुसळधार पाऊस चालू राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीतील विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.


लोणावळा, खंडाळा आणि मावळ भागात अतिवृष्टी !

लोणावळा (पुणे) – अतिवृष्टीमुळे लोणावळा, खंडाळा आणि मावळ हे परिसर जलमय झाले असून या परिसरात ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे लोणावळा खंडाळ्यासह मावळातील ओढे, नाले आणि नदीकाठच्या अनेक गावांतील घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही पूल पाण्याखाली गेल्याने परिसरातील गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे. घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.


शासन-प्रशासनाकडून विविध स्तरांवर करण्यात येणारे सहकार्य

मंत्र्यांना जिल्हा न सोडण्याच्या सूचना !

राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टी झाल्याने संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि संबंधित मंत्री अन् लोकप्रतिनिधी यांना परिस्थिती पूर्ववत् होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, भास्कर जाधव, शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतीवृष्टीग्रस्त भागातील बचाव आणि साहाय्य कार्यात सहभागी झाले आहेत.


‘नोडल’ अधिकार्‍याची नियुक्ती !

अतीवृष्टीग्रस्त भागातील बचाव आणि साहाय्य कार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर ‘नोडल’ (विशिष्ट कार्याच्या पूर्ततेसाठी नेमण्यात येणारा अधिकारी) अधिकारी म्हणून दायित्व सोपवले आहे.


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष !

‘राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव आणि साहाय्य कार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने अतीवृष्टीग्रस्त भागातील साहाय्य आणि बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक ते निर्देश तातडीने दिले जात आहेत’, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.