विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याकडून एकूण १८ सहस्र १७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त

बँकांना ८ सहस्र ४४१ कोटी रुपये केले परत !

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी

नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) आतापर्यंत घोटाळेबाज विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची एकूण १८ सहस्र १७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. बँकांच्या झालेल्या एकूण हानीपैकी ही रक्कम जवळपास ८०.४५ टक्के इतकी आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीपैकी मोठा भाग सरकारी बँका आणि केंद्र सरकार यांच्या कह्यात देण्यात आला आहे. यात एकूण ९ सहस्र ३७१ कोटी रुपयांचा समावेश आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी पसार असून विदेशात आहेत. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.

बँकांची एकूण २२ सहस्र ५८५ कोटी रुपयांची फसवणूक

ईडीने दिलेल्या माहितीनुसार विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी सरकारी बँकांची एकूण २२ सहस्र ५८५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मेहुल चोक्सी याने एकट्यानेच पंजाब नॅशनल बँकेला १३ सहस्र ५०० कोटी रुपयांना फसवले आहे. या तिघांची एकूण मिळून १८ सहस्र १७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीपैकी ९६९ कोटी रुपयांची मालमत्ता विदेशात आहे. सरकारी बँकांना आतापर्यंत ८ सहस्र ४४१ कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.