हिंदूंना देशात सन्मानाने रहाता यावे, यासाठी घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर राष्ट्रप्रेमी नागरिक अन् जिज्ञासू यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

मुंबई – फाळणीनंतर पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी त्यांच्या देशांतील बहुसंख्यांक नागरिकांच्या धर्मानुसार इस्लामी राजवट स्वीकारली. भारताने मात्र बहुसंख्य हिंदूंना डावलून येथे निधर्मी राजवट चालू केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात अल्पसंख्यांकांना झुकते माप देऊन हिंदूंचे कायम दमन करण्यात आले. हिंदूंमध्ये ‘निधर्मी’ नावाचा विषाणू जोपासला गेला आणि अन्य धर्मियांना मात्र त्यांच्या धर्मासाठी मोकळीक देण्यात आली. त्यामुळेच आज भारतातील ९ राज्यांमध्ये हिंदूंवर अल्पसंख्यांक होण्याची वेळ आली आहे. असेच चालू राहिले, तर जगात शरणागतीसाठी हिंदूंना एकही ठिकाण शेष रहाणार नाही. ही वेळ येऊ नये, तसेच हिंदूंवरील आघात रोखून देशात सन्मानाने रहाता यावे, यासाठी घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावरील राष्ट्रप्रेमी नागरिक अन् जिज्ञासू यांच्यासाठी नुकतेच ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये श्री. घनवट यांनी वरील आवाहन केले.

या कार्यक्रमात सनातनच्या साधिका डॉ. (सौ.) सायली यादव यांनी ‘आनंदी जीवनासाठी धर्माचरणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याची ओळख करून दिली. मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात येथून राष्ट्रप्रेमी नगारिक अन् जिज्ञासू या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विनामूल्य ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गाचे आयोजन केले जाते. जिज्ञासू आणि राष्ट्रप्रेमी यांनी धर्मशिक्षणवर्गाला जोडून त्याचा लाभ करून घेण्याचे आवाहन या वेळी डॉ. (सौ.) सायली यादव यांनी केले.

शिक्षणाची दुर्दैवी स्थिती पालटण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय ! – सुनील घनवट

सुनील घनवट

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली स्वातंत्र्यानंतर हिंदूंचा इतिहास, धर्म, शिक्षणव्यवस्था यांमध्ये नियोजनबद्ध विकृतीकरण करून हिंदूंना धर्म आणि गुरुकुल शिक्षणपद्धत यांपासून वंचित ठेवले गेले. धर्मनिरपेक्ष व्यवस्थेत मदरशांमध्ये कुराण आणि ख्रिस्ती शाळांमधून बायबल शिकवले जाते. शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये मात्र भगवद्गीता शिकवली गेली, तर निधर्मींकडून ‘शिक्षणाचे भगवेकरण’ होत असल्याची ओरड चालू होते. ही दुर्दैवी स्थिती पालटण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय आहे.

तणावमुक्त आनंदी जीवनासाठी ‘धर्माचरण’ आवश्यक ! – डॉ. (सौ.) सायली यादव, सनातन संस्था

डॉ. (सौ.) सायली यादव

‘येणारा काळ भयावह आहे’, असे अनेक संत, द्रष्टे आणि भविष्यवेत्ते यांनी सांगितले आहे. वर्तमानकाळातील कोरोनाची महामारी, वादळे, महापूर, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि राष्ट्रांमधील वाढता तणाव पहाता हीच प्रत्यक्ष आपत्काळाची स्थिती होय. ‘तिसरे महायुद्ध’ हे यांतील सर्वांत मोठे संकट असेल. ‘राजा धर्माधिष्ठित नसेल, तर प्रजा धर्मपालन करत नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते’, असे ‘कौशिकपद्धती’ या ग्रंथांत लिहिले आहे. याउलट धर्मपालनामुळे सुख, शांती आणि यश मिळते अन् कल्याण होते. दैनंदिन पूजा, नामजप, सण- उत्सव शास्त्र समजून करणे, कुलाचार, कुलपरंपरा पाळणे यालाच ‘धर्माचरण’ म्हणतात. धर्माचरण म्हणजेच प्रतिदिन साधना केल्याने जीवनातील तणाव न्यून होऊन आनंद मिळतो. तसेच जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म करतो.