‘म्युकरमायकोसिस’चे आव्हान !

कोरोनामुळे ‘म्युकरमायकोसिस’ या गंभीर आजाराने डोके वर काढले आहे. सध्या महाराष्ट्रात ८०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून प्रशासनापुढे एक नवे आव्हान उभे राहिले आहे. सध्या पुण्यात नव्या आजाराच्या रुग्णांसाठी महापालिकेच्या दळवी रुग्णालयात १५ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ससून रुग्णालयातही ५० ऑक्सिजन बेड आणि १० आयसीयू बेड ठेवण्यात आले आहेत. अन्य रुग्णालयांतही प्रतिदिन या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांवर उपचार चालू आहेत; मात्र वाढती रुग्णसंख्या पहाता ही सिद्धता पुरेशी आहे का ? असा प्रश्‍न निर्माण होतो. पुणे येथे बुरशीजन्य आजारावरील औषधांचा तुटवडा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने सांगितले आहे. नागपूर येथेही अशी स्थिती उद्भवली आहे. त्यातच ‘रेमडेसिविर’च्या वेळी औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यावर काळाबाजार कशा प्रकारे होतो ? याचा दाहक अनुभव समाजाने घेतलेला आहे. आता या आजारावरील उपचारांच्या वेळी असा अनुभव येऊ नये, ही जनतेला आशा आहे.

म्युकरमायकोसिस

‘म्युकरमायकोसिस’चे उपचार खर्चिक आहेत. शासनाने उपचारांचा खर्च उचलण्याची सिद्धता दर्शवली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेचा उडालेला बोजवारा पहाता तिचा सर्वसामान्यांना लाभ मिळण्यासाठी स्थानिक पातळीवर कठोर कार्यवाहीची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेत कोरोनाच्या काळात अनावश्यक कामांवर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा आरोप करण्यात आला होता. सध्याच्या आपत्कालीन स्थितीत असा अपव्यय परवडणारा नाही. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या खर्चावर अंकुश ठेवण्यासह तो पारदर्शकच असायला हवा.

जिथे या उपचारांच्या सुविधा नाहीत, त्यांना जवळच्या मोठ्या शहरांत जोडून द्यायला हवे. शासन एकीकडे प्रयत्न करत आहे; मात्र रुग्णसंख्येचा आवाका आणि उपचारांसाठीची मर्यादा लक्षात घेता प्रयत्नांचा स्तर पुष्कळ वाढवणे अपेक्षित आहे. तज्ञ डॉक्टरांचे सल्ले घेऊन या आजाराच्या प्रतिबंधासाठी जनजागृती, स्थानिक पातळीवर सक्षम व्यवस्था आणि गैरप्रकार करणार्‍यांना तात्काळ कठोर शिक्षा यांद्वारे आव्हानासाठी शासनाने सिद्ध रहायला हवे !

– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, देवद, पनवेल.