आता पाणी डोक्यावरून गेले आहे, आजच्या आज ऑक्सिजन पुरवा !

  • देहली उच्च न्यायालयाने ऑक्सिजनवरून केंद्र सरकारला फटकारले !

  • देहलीतील बत्रा रुग्णालयात ऑक्सिजनअभावी कोरोनाबाधित ८ रुग्णांचा मृत्यू, एका डॉक्टरचा समावेश !

देहली उच्च न्यायालय

नवी देहली – आता पाणी डोक्यावरून गेले आहे. आता आम्हाला कार्यवाही हवी आहे. तुम्ही आता सगळ्याची व्यवस्था करावी. काहीही करून देहलीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला गेला पाहिजे, असा आदेश देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारत दिला.

देहलीतील बत्रा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन पुरवठ्याच्या अभावी एका डॉक्टरसह ८ रुग्णांचा मृत्यू झाला. देहलीतील काही रुग्णालयांनी उच्च न्यायालयात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी याचिका प्रविष्ट केल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची तक्रार या रुग्णालयांकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून घोषित केलेला साठाही पुरवला जात नसल्याची बाजू राज्य सरकारने मांडली आहे. यासंदर्भात देहली उच्च न्यायालयात प्रतिदिन सुनावणी चालू आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारतांना म्हटले की, आम्ही केंद्र सरकारला निर्देश देतो की, त्यांनी काहीही करून देहलीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवावा. त्यासाठीचे टँकर पुरवण्याचे दायित्वही केंद्राचेच आहे. २० एप्रिलला ऑक्सिजन पुरवठ्याचा निर्णय सरकारने घेतला; मात्र तेव्हापासून आजपर्यंत एकही दिवस देहलीला ठरलेला पूर्ण ऑक्सिजनचा कोटा मिळालेला नाही. कुणीही तुम्हाला ठरल्यापेक्षा अधिक ऑक्सिजन मागत नाही. जर तुम्ही आज पुरवठा करू शकला नाहीत, तर आम्ही ३ मे या दिवशी तुमचे विश्‍लेषण ऐकू, अशा शब्दांत न्यायालयाने सुनावले.

सैन्याचे साहाय्य घ्या !

न्यायालयाने म्हटले की, जर तुम्ही सैन्याचे साहाय्य घेतले, तर ते त्यांच्या स्तरावर काम करतील. त्यांच्याकडे त्यांची स्वत:ची व्यवस्था आहे.