गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी ५ वाहनांची जाळपोळ करत कापडी फलक लावले !

गडचिरोली – जिल्ह्यातील दक्षिण भागात नक्षलवाद्यांनी मेडपल्ली येथील रस्त्याच्या कामावरील ५ वाहनांची २६ एप्रिल या दिवशी पहाटे जाळपोळ केली. त्यामुळे या भागात दहशत निर्माण झाली आहे. या ५ वाहनांमध्ये ३ ट्रॉली, १ लेव्हल ट्रॅक्टर आणि २ टँकर यांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांकडून २६ एप्रिलला ‘भारत बंद’ची घोषणा करण्यात आली होती.

मागील १ मासापासून परिसरात ‘पंतप्रधान ग्रामसडक योजने’च्या अंतर्गत मेडपल्ली ते तुमीरकसा रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम चालू होते. त्यामुळे कामावर असलेली वाहने मेडपल्ली या गावात ठेवण्यात आली होती. याच वाहनांना नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले आणि सर्व वाहने पेटवली. जाळपोळ केल्याच्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी कापडी फलकही लावले.