गृहमंत्री अनिल देशमुख यांना हटवण्याविषयी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ ! – शरद पवार

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये मागितल्याच्या परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली !

शरद पवार

नवी देहली – परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. परमबीर सिंह मलाही भेटले होते; पण त्यांनी केवळ त्यांच्या स्थानांतराविषयी म्हणणे मांडले होते. त्याचसमवेत त्यांच्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे म्हटले होते. त्यापलीकडे त्यांनी मला काहीही सांगितले नाही. पत्रकार परिषदेपूर्वीच माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. देशमुख यांच्याविषयीचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. या संदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी चौकशी करून निर्णय घ्यावा. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असे शरद पवार यांनी देहली येथे त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ‘प्रतिमहा १०० कोटी रुपये गोळा करून देण्यास सांगितले होते’, असा गंभीर आरोप केला आहे. त्याविषयी पवार बोलत होते.

महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे !

पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस देहलीमध्ये आल्यानंतर हे पत्र समोर आले आहे. त्या पत्रावर परमबीर सिंह यांची स्वाक्षरी नाही. सचिन वाझे यांना पोलीसदलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांचाच होता. गृहमंत्र्यांनी प्रतिमहा १०० कोटी जमा करण्याचे लक्ष्य दिल्याचा आरोप या पत्रात आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला पाठवले आहे. यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जातात, याविषयी नमूद करण्यात आलेले नाही. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकार्‍यांकडून चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.