हरिद्वार कुंभमेळ्यात सहभागी होणार्‍या काही संतांना हवेत सशस्त्र सुरक्षारक्षक !

पोलिसांकडून ५ प्रमुख संत आणि २६ अन्य संत यांना सुरक्षा प्रदान

हरिद्वार (उत्तराखंड) – १ एप्रिलपासून येथे होणार्‍या कुंभेळ्यासाठी सुरक्षाव्यवस्था करण्यात आली असली, तरी काही संतांना असुरक्षित वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि महामंत्री यांच्यासहित ५ प्रमुख संतांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात आली आहे, तर अन्य २६ संतांना सरकारी खर्चाने सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त पोलीस, अर्धसैनिक दल, राष्ट्रीय सुरक्षादलाचे कमांडो यांनाही तैनात केले आहे. या पार्श्‍वभूमीवर १० हून अधिक संतांनी सुरक्षेची मागणी केली आहे. वास्तविक या संतांना कुठलीही धमकी किंवा गुप्तचर खात्याने धोक्याविषयी माहिती दिलेली नाही.

पोलीस महानिरीक्षक संजय गुंज्याल

याविषयी कुंभमेळ्याचे पोलीस महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी म्हटले आहे की, सध्यातरी पोलीस संरक्षण पुरवणे शक्य नाही. मेळ्याच्या कालावधीत आवश्यकता भासल्यास संरक्षण पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल.