राममंदिराची देशवासियांची प्रतीक्षा लवकरच पूर्ण होईल ! – मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व. संघ

सरसंघचालकांची तपोभूमी गुरुपिठाला भेट

सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी समाधीस्थानी पुष्पांजली अर्पण करतांना सरसंघचालक मोहन भागवत आणि मध्यभागी सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

कुंडई – हिंदु धर्मातील एकता, हीच आपल्या संस्कृतीची देण आहे. त्यामुळे जगाच्या उन्नतीचे स्वप्न पूर्ण होण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी देव, देश अन् धर्म यांचे ऐक्य आवश्यक आहे. धर्मकार्याच्या मुळात मातृभूमी आहे. संतांच्या आणि धर्मपिठांच्या धर्मकार्यातून श्रीराममंदिर लवकरच पूर्ण होणार असून देशवासियांची प्रतीक्षा पूर्ण होणार असल्याचे उद्गार रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवतजी यांनी काढले. श्रीराममंदिर निर्माण आंदोलनात प.पू. पद्मनाभ शिष्य संप्रदायाचे पूर्व पिठाधीश्‍वर राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांनी गोमंतकियांचे यशस्वी नेतृत्व केले होते, तसेच विद्यमान पिठाधीश्‍वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध सभा, बैठका यांच्या माध्यमातून यशस्वी नेतृत्व केले आहे. अशा या दैदिप्यमान कार्याची नोंद घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत यांनी ३१ जानेवारीला गोमंतकाचे हृद्य हिंदु धर्मपीठ, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपिठावर राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांच्या समाधीस्थानी पुष्पांजली अर्पण करून पिठाधीश्‍वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या दर्शनार्थ विशेष भेट घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.

याप्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रीरामंदिरासाठी विशेष कार्य केलेल्या राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन श्रीचरणी पुष्पांजली समर्पित केली. त्याचप्रमाणे धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले.

या वेळी रा. स्व. संघाचे गोवा प्रदेश संघचालक नाना बेहरे, सतीश धोंड, सुमंत आमशेकर, श्री दत्त पद्मनाभ पिठाचे संचालक, व्यवस्थापक आदी उपस्थित होते.

हिंदूऐक्याचे धोरण हिंदूंनी जपावे ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी अनेकांनी बलीदान दिले आहे. कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रीरामजन्मभूमी संदर्भातील निकाल अत्यंत शांततापूर्ण आणि सकारात्मक पद्धतीने लागल्याने सर्व देशभर अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूऐक्याचे धोरण हिंदूंनी जपावे. हिंदूंनी धर्मकार्यासाठी जागृत होण्याची आवश्यकता आहे. हिंदु हा संप्रदाय कार्याचा प्रमुख बिंदू आहे आणि धर्मकार्य हा संप्रदायाचा प्राण आहे, असे उद्बोधन पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी त्यांच्या आशीर्वचनातून केले.