सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी एन्.सी.बी.च्या मुंबई पाठोपाठ पुण्यातही धाडी

मुंबई एन्.सी.बी.च्या पथकाची कारवाई

पुणे – अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात अमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एन्.सी.बी.) पथकाने मुंबई पाठोपाठ २३ जानेवारी या दिवशी पुण्यातील हडपसर आणि खडकवासला परिसरात धाडी टाकल्या. याच प्रकरणात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांना अमली पदार्थ पुरवणार्‍या चिंकू पठाण आणि आरीफ भोजवाल यांची नावे समोर आल्यानंतर एन्.सी.बी.च्या पथकाने दोघांनाही अटक करून त्यांच्या पुण्यातील सहकार्‍यांच्या घरासह गोडाऊनवर धाडी टाकल्याचे समोर आले आहे.

त्यांच्या चौकशीमध्ये राजू सोनावणे हा त्यांचा साथीदार असून त्याची अमली पदार्थ तस्करीमध्ये महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती एन्.सी.बी.ला मिळाल्यावर त्याचे खडकवासला येथील घर आणि हडपसरमधील गोडाऊन यांवर एन्.सी.बी.ने धाडी टाकल्या. पठाण आणि भोजवाल या दोघांना अटक झाल्यानंतर सोनावणे पळून गेला आहे. त्याच्या घरात महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. त्याचे ३ मोठे गोडाऊन आहेत, जेथे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आहेत; मात्र एन्.सी.बी.ने त्याचे गोडाऊन उद्ध्वस्त केले असून पुण्यातील जाळे नष्ट केले आहे. तो कर्नाटकमधून फळे, धान्याची वाहतूक करतांना अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. एन्.सी.बी.चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई एन्.सी.बी.च्या पथकाने ही कारवाई केली.