धर्मांधांकडून खारघर येथील गोशाळेतील गायींची दुसर्‍यांदा चोरी

पहिल्या चोरीच्या प्रकरणात कर्तव्यचुकार पोलिसांनी कारवाई न केल्याचा परिणाम !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना गायींची होणारी चोरी म्हणजे धर्मांध गोतस्करांना कायदा आणि पोलीस यांचे कोणतेही भय राहिले नसल्याचेच यातून दिसून येते. गायींची चोरी होत असतांनाही त्यावर कोणतीही कारवाई न करणार्‍या पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी गोप्रेमींची मागणी आहे ! – संपादक

पनवेल – खारघर रेल्वेस्थानकाच्या जवळ असलेल्या नंदिनी गोशाळेत ५ डिसेंबरला रात्री ७ धर्मांधांनी गोसेवकांना शस्त्राचा धाक दाखवून २ गायी आणि एक वासरू चोरून नेले. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दीड वर्षापूर्वी धर्मांधांनी या गोशाळेतून अशाच प्रकारे गायींची चोरी केली होती; मात्र तेव्हा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. ‘अनधिकृत कत्तलीसाठी गोशाळेतील जनावरांची चोरी केली जात आहे’, असा आरोप पूज्य गोळवलकर गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नंदिनी गोशाळेचे संचालक शैलेश खोतकर यांनी केला आहे.

खारघरसारख्या शहरात गोशाळेतील गायींची चोरी होणे हा गंभीर विषय आहे. यापूर्वीही असा निंदनीय प्रकार घडला असून संबंधितांवर कारवाई व्हायला हवी ! – बिना गोगरी, अध्यक्षा, भारत रक्षा मंचाच्या महिला मोर्चा