संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांना निवडून आणा ! – संजय केळकर, आमदार, भाजप

पदवीधर शिक्षकांना मार्गदर्शन करतांना आमदार संजय केळकर

सांगली – हे सरकार भरकटलेले असल्याने मंत्रालयात स्थानांतरणाविना दुसरी कोणतीच कामे होत नाहीत. त्याठिकाणी मोठी दुकानदारी चालू आहे. तिघांच्या असलेल्या या सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे. हे रोखण्यासाठी विधान परिषदेत आपली माणसे जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार श्री. संग्राम देशमुख आणि श्री. जितेंद्र पवार यांना निवडून आणा, असे आवाहन ठाण्याचे भाजप आमदार श्री. संजय केळकर यांनी केले. श्री. संग्राम देशमुख आणि श्री. जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ गावभाग येथील हरिदास भवन येथे पदवीधर शिक्षकांसाठीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्यासाठी उपस्थित पदवीधर शिक्षक

श्री. संजय केळकर पुढे म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक यांचे प्रश्‍न प्रभावीपणे मांडले जाण्याची आवश्यकता आहे. मतदार पदवीधर असूनही कित्येक मते वाया का जातात हेच समजत नाही ? हे जाणून घेण्यासाठी मतदान कसे करावे, हे जाणून घेतले पाहिजे. शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम चालू आहे. केंद्र सरकार शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र पालट करीत असले, तरी राज्य सरकार मात्र उदासीन आहे. भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ म्हणाले, भाजप आणि मित्रपक्ष यांच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.

अध्यक्ष स्थानावरून बोलतांना सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीन खाडीलकर म्हणाले, सांगली शिक्षण संस्था एक विचारधारा घेऊन काम करणारी संस्था आहे. त्यामुळे सांगली शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक १०० टक्के मतदान करतील. पुरोहित कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा केतकर यांनी आभार मानले. या वेळी शिक्षक परिषद राज्याचे अध्यक्ष श्री. वेनुनाथ कडू, पुणे विभागाचे श्री. राजेंद्र नागरगोजे, संघटक सरचिटणीस श्री. दीपक माने, नगरसेवक श्री. विनायक सिंहासने, नगरसेवक श्री. संजय कुलकर्णी, सर्वश्री विजय भिडे, रामकृष्ण चितळे, गणपति साळुंखे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.