देवा, या परिस्थितीला काय म्हणायचे ?

‘भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा काळ आणि स्वातंत्र्योत्तर ५० वर्षांनंतरचा आताचा काळ यांची तुलना केल्यावर समाजाची झालेली दुरवस्था माझ्या लक्षात आली. तेव्हा मला देवाच्या कृपेने स्फुरलेली कविता पुढे देत आहे.

सौ. मीनल शिंदे

देवा, या परिस्थितीला काय म्हणायचे ? ।
तुझी लीला म्हणायची कि ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेपूर्वीचा कठीण काळ ।
चालू झाल्याची खूणगाठ म्हणायची ? ॥ धृ. ॥

एकेकाळी सर्व महासागर शुद्ध होते ।
अन् सर्व नद्याही निर्मळ होत्या ।
आता मात्र गाळच गाळ दिसतो सगळीकडे ॥ १ ॥

एकेकाळी शेतीमध्ये समृद्धता होती ।
वातावरणामध्ये शुद्धता होती ।
आता मात्र अशुद्धता पसरली आहे सगळीकडे ॥ २ ॥

एकेकाळी धार्मिक उत्सव आणि व्रते यांवर श्रद्धा होती ।
संसारातही सुसंस्कार होते ।
आता मात्र श्रद्धेच्या नावाखाली ।
देवकार्याचा बाजार भरतो सगळीकडे ॥ ३ ॥

एकेकाळी स्नेहसंबंधांमध्ये आपुलकी अन् प्रेम होते ।
नात्यांमध्ये जिव्हाळा होता ।
आता मात्र तिरस्कार दिसतो सगळीकडे ॥ ४ ॥

एकेकाळी प्रत्येक जण दुःखातही आनंद मानत होता ।
इतरांना आनंद देण्यासाठी सतत झटत होता ।
आता मात्र स्वतःच्या सुखालाच आनंद मानतात सगळीकडे ॥ ५ ॥

एकेकाळी आहे त्या स्थितीतही आनंद मिळत होता ।
मानवाला परिस्थितीचा बोध होत होता ।
आता मात्र अनैतिकतेची स्थिती दिसते सगळीकडे ॥ ६ ॥

एकेकाळी पुढारी स्वातंत्र्यासाठी लढत होते ।
सर्व जण राष्ट्र अन् धर्म हितासाठी प्राणार्पण करण्यासही सिद्ध होते ।
आता मात्र स्वार्थ साधण्यासाठी स्वतःचा पक्ष काढून ।
प्राणप्रणाने प्रयत्न करतात सगळीकडे ॥ ७ ॥

एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता ।
अवघ्या विश्‍वात भारत देश आदर्श आणि ‘विश्‍वगुरु’ होता ।
आता मात्र अनेक जण देशाचे तुकडे करण्यात धन्यता मानतात सगळीकडे ॥ ८ ॥

देवा, तूच या विश्‍वाचा पालनकर्ता आहेस ।
आता ‘तुझ्या या लीलेतील आनंदाची अनुभूती घ्यायची ।
कि या कठीण काळाच्या आहारी जायचे ?’, हे ठरवण्यासाठी तूच सर्वांना सुबुद्धी दे ॥ ९ ॥

– सौ. मीनल राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१.२०२०)