गुरुस्तवन भावांजली : साधकांना गुरुकृपायोगरूपी तारक मंत्र प्रदान करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

  • उद्या २९ जुलै २०२६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने...

  • गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 

काया काशी गुरु उपदेशी । तारक मंत्र दिला आम्हाशीं ।
बापरखुमादेवीवराशी । ध्यान मानसीं लागलें ।। 

अर्थ : श्री गुरु ‘तुझा देह ही प्रत्यक्ष काशीच आहे’, असा उपदेश करून तारक मंत्र देतात. तो तारक मंत्र श्री गुरूंनी आम्हाला दिल्यामुळे माझे पिता आणि रखुमादेवीचा पती श्री विठ्ठलाचे ध्यान आमच्या मनाला लागले.

सामान्यतः माणूस काशीला तीर्थयात्रेसाठी जातो; परंतु श्री गुरु साधकांना अशी दृष्टी देतात की, हा ‘देह’ हीच ‘काशी’ असल्याचे त्याला उमजते. ‘अंतर्यामी असलेल्या ईश्वराची जाणीव होणे’, हेच खरे ज्ञान आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव साधकांना अंतर्मुख करून त्यांच्यातील भगवद्स्वरूप जागृत करत आहेत. त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळेच साधकांच्या अंतःकरणात ज्ञान-भक्तीचा झरा वाहू लागला आहे.

ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरमाऊलींना त्यांच्या गुरूंनी तारक मंत्र दिला, त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी अखिल मानवजातीसाठी कलियुगातील वेद असलेला ‘गुरुकृपायोग’ हा सर्वश्रेष्ठ मार्ग सांगितला आहे. ही गुरुकृपायोगानुसार साधना, म्हणजे जणू साधकांना आपत्काळातून तारणारा ‘तारक मंत्र’ आहे.

साधक जेव्हा ‘भावार्चना (भावजागृतीचे प्रयत्न)’ करतात, तेव्हा साधकांचे मन भगवंताच्या सान्निध्यात असते. त्यामुळे त्यांचे मन जगातील मायायुक्त विषयांकडून भगवंताच्या चरणांकडे स्थिरावू लागते. साधकांना साधना आणि गुरुसेवा करतांना

श्री गुरूंच्या कृपेनेच देहभान विसरता येऊन आत्मस्वरूपाचा आनंद मिळत आहे. साधकांना आत्मज्ञान देणार्‍या ज्ञानस्वरूप श्री गुरूंच्या चरणी कोटी कोटी नमन !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२७.७.२०२६)