‘नमामि इंद्रायणी’ योजनेवर कोट्यवधी रुपये व्यय करूनही तिचे प्रदूषण रोखण्यास अपयश ! – आमदार नाना पटोले, काँग्रेस

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – ‘नमामि इंद्रायणी’ योजना चालू करून सरकारने कोट्यवधी रुपयांचे प्रावधान केले. या योजनेच्या अंतर्गत इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचे काम होणे अपेक्षित होते; मात्र इंद्रायणी नदी रासायनिक प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे, अशी टीका काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाची माहिती देतांना केली.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांचा इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाविषयीचा स्थनग प्रस्ताव नाकारला; मात्र त्याविषयी थोडक्यात माहिती देण्यास सांगितले. त्या वेळी नाना पटोले म्हणाले, ‘‘राज्यभरातून लाखो वारकरी देहू अन् आळंदी येथे येतात. परंपरेनुसार इंद्रायणी नदीत स्नान करून तिचे पवित्र पाणी वारकरी ‘तीर्थ’ म्हणून प्राशन करतात. पिंपरी-चिंचवड येथून मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे, तसेच जलपर्णी यांमुळे इंद्रायणी नदीवर फेस तरंगतो. या रसायनयुक्त पाण्यामुळे वारकर्‍यांना धोका निर्माण झाला आहे. औद्योगिक आस्थापने, राज्य औद्योगिक विकास महामंडळ, तसेच गृहनिर्माण संस्था यांच्याकडून रासायनिक मिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. या प्रकरणी दोषी आस्थापनांवर सरकार कारवाई करणार का ? आषाढी वारीसाठी येणार्‍या लाखो वारकर्‍यांना स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सरकार काय उपाययोजना करणार ?’’ स्थगन प्रस्ताव नाकारण्यात आल्यावर यावर सभागृहात चर्चा झाली नाही. त्यामुळे अंतिम आठवडा चर्चेच्या वेळी सरकारकडून यावर उत्तर दिली जाण्याची शक्यता आहे.