भंगारच्या गाड्यांवर ठपका !

महाराष्ट्र विधानभवनाचे ‘सिक्युरिटी ऑडिट’

श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक सनातन प्रभात

मुंबई, २ जुलै (वार्ता.) – विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सुरक्षा आणि संरक्षण संस्थांकडून महाराष्ट्र विधानभवनाचे सुरक्षा स्थितीचे मूल्यांकन (सिक्युरिटी ऑडिट) करण्यात आले आहे. याचा गुप्त अहवाल सुरक्षा आणि संरक्षण संस्थांकडून विधीमंडळ प्रशासनालाही देण्यात आला आहे. यामध्ये विधानभवनाच्या वाहनतळामधील भंगारच्या गाड्यांवर ठपका ठेवला असून सुरक्षेच्या कारणास्तव या भंगार गाड्या हटवण्याचा सल्ला सुरक्षा आणि संरक्षण संस्थांनी विधीमंडळ प्रशासनाला दिला आहे, अशी खात्रीशीर माहिती विधानभवनातील एका अधिकार्‍यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

श्री. प्रीतम नाचणकर

वाहनतळावरील भंगारच्या गाड्यांसह सुरक्षेच्या दृष्टीने एकूण १३ सूचना सुरक्षा आणि संरक्षण संस्थांकडून विधीमंडळ प्रशसनाला करण्यात आल्याची माहितीही या अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे विधानभवनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या सूत्रांवर योग्य ती कार्यवाही करून याविषयीची माहिती विधीमंडळ प्रशासनाला संबंधित सुरक्षा यंत्रणेला द्यावी लागणार आहे. विधानभवनाच्या बाहेरील वाहनतळामध्ये १५ हून अधिक भंगार गाड्या पडल्या आहेत. मागील काही वर्षांपासून या गाड्या विधानभवनाच्या वाहनतळाच्या जागेत सडत आहेत.

वाहतूक पोलिसांसमवेत बैठक घेऊन कार्यवाही करणार !

वाहनतळावरील भंगारच्या गाड्या हटवणे आणि वाहतुकीचे सुनियोजन यांविषयी विधीमंडळाचे सचिव शिवदर्शन साठे यांना विचारले असता ‘याविषयी वाहतूक पोलिसांसमवेत बैठक घेऊन कार्यवाहीची सूचना देतो’, असे सांगितले. विधीमंडळाचे मालमत्ता अधिकारी प्रदीप टिबे यांनी अधिवेशन झाल्यावर भंगारच्या गाड्या उचलण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.


हे ही वाचा →

अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !

विधानभवनाच्या वाहनतळात बेवारसपणे पडून आहेत १५ हून अधिक वाहने !

महत्त्वाच्या आणि अतीमहत्त्वाच्या ठिकाणांचे होते सुरक्षा मूल्यांकन !

राज्य गुप्तवार्ता विभाग, राज्य पोलीस, सुरक्षा तज्ञ आदींकडून राज्याची महत्त्वाची  आणि संवेदनशील ठिकाणे किंवा वास्तू यांचे वर्षातून एकदा सुरक्षा मूल्यांकन केले जाते. मोठ्या शहरांमध्ये अशी ठिकाणे आणि वास्तू यांचा सुरक्षा मूल्यांकनाचा अहवाल पोलीस आयुक्तांना दिला जातो, तसेच संबंधित ठिकाण किंवा वास्तू यांच्याशी संबंधित उत्तरदायी अधिकार्‍यांनाही याविषयी सांगितले जाते. त्यानुसार संबंधित यंत्रणेकडून आवश्यक कार्यवाही केली जाते. त्यामुळे सुरक्षा आणि संरक्षण संस्थांनी सुरक्षा मूल्यांकनामध्ये सुचवलेल्या सूत्रांवर विधीमंडळ प्रशासनालाही योग्य ती कार्यवाही करावी लागणार आहे.